खूूप वाचा, खूप लिहा आणि आनंदी रहा-दिवसे

0
25

भंडारा दि.२९-: निस्पृहपणे एखादी गोष्ट केल्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो. ग्रंथाचे वाचन हा कुठल्याही आनंदापेक्षा वेगळाच असून ग्रंथासारखा मित्र नाही. परंतु आजच्या आधुनिक जगात हा आनंद हरपला आहे. शिक्षकांनी मुलांच्या मनात वाचनाप्रती आवड निर्माण करावी. खुप वाचा, खुप लिहा आणि आनंदी रहा, असा सल्ला जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय सचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २८ व २९ नोव्हेंबर रोजी जकातदार विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय भंडारा येथे जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या उदघाटनपर भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर होते. प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, ग्रंथालय सहाय्यक संचालक मिनाक्षी कांबळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खिजेंद्र बोपचे, उपशिक्षणाधिकारी उमाकांत दुबे, मुख्याध्यापिका मंदा चोले प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, मी पण पूर्वी लेखक, प्रकाशक होतो पण आज वाचक आहे. त्यामुळे मला या क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. मी स्वत: दररोज ग्रंथाचे ४० पाने वाचल्याशिवाय झोपत नाही, असेही ते म्हणाले. पुस्तक व चित्रपट यांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. ईलेक्टानिक्स साहित्यामुळे मुलांमध्ये वाचनाची संस्कृती लोप पावली असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांनी दैनंदिन वृत्तपत्र वाचावे तसेच दररोज काही तरी लिहीण्याचा प्रयत्न करावा.
‘का अशी जपते तूही गोंधळीचा वारसा, तोच माझा चेहरा तोच माझा आरसा’ अशा काव्यमय पक्तींने ज्येष्ठ कवी व सखे सजनी कार प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी भाषणास सुरुवात करुन उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले, सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या सारख्या थोर समाजसुधारकांची चारित्र्ये, ग्रंथ संपदा वाचा. समाजाचे प्रतिबींब साहित्यातून घडत असते.ग्रंथाचे वाचन करा. अंधश्रध्देच्या आहारी जावू नका, शाळा, ग्रंथालय हीच मंदिरे आहेत. ग्रंथालय मंदिर झाली पाहिजे म्हणून ग्रथांची पूजा करा. यावेळी मिनाश्री कांबळे म्हणाल्या की, ग्रंथाच्या वाचनाने उत्तुंग व्यक्तिमत्व घडण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी वेळेचे भान ठेवून अवांतर वाचन व टि.व्ही बघावे. शालेय पुस्तकातून ज्ञान संपादित करावे. वाचाल तर वाचाल, असे आवाहन त्यांनी केले. ग्रंथोत्सवाचे आयोजन ग्रंथालय चळवळीस चालना देण्यासाठीच आहे, असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविकातून जिल्हा ग्रंथालय अधिकारी खिजेंद्र बोपचे ग्रंथोत्सव आयोजनाबाबत माहिती विषद केली. संचालन प्रा. आरती देशपांडे यांनी तर जकातदार विद्यालयाच्या विद्यार्थींनी समूहगान सादर केले. सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाचा शुभारंभ जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम यांचे हस्ते झाला. ही ग्रंथदिडी जकातदार शाळा, गांधी चौक ते परत जकातदार शाळा येथे समारोप झाला.