दक्षिण आफ्रिकेच्या वायव्य प्रांताच्या विधिमंडळामध्ये खासदार रक्षा खडसे यांचे भाषण

0
15

मंबाथो दि. 4 : राष्ट्रकुल युवा संसद सदस्यांच्या अधिवेशनामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी “भारतीय लोकशाही आणि सुशासन” या विषयावर आपले विचार मांडले. या अधिवेशनाची सुरुवात काल दि. 2 नोव्हेंबर, 2014 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या वायव्य प्रांताच्या “मंबाथो” येथील विधिमंडळ सभागृहात झाली. यावेळी वायव्य प्रांताच्या विधिमंडळाच्या अध्यक्षा सुसाना रिबेका तसेच विविध राष्ट्रकुल देशांच्या संसद तसेच विधिमंडळातून आलेले युवा संसद तसेच विधिमंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार रक्षा खडसे यांनी “भारतीय लोकशाही व सुशासन” या विषयावर आपले विचार मांडताना जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील संसद सदस्य तसेच विधिमंडळ सदस्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची निवड प्रक्रिया यावर सविस्तर विवेचन केले. भारतीय राज्य घटनेप्रमाणे भारतासारख्या मोठ्या व खंडप्राय देशामध्ये सुशासन राहण्यासाठी राजकीय व्यवस्था, कार्यकारी व प्रशासकीय व्यवस्था, न्यायपालिका व प्रसिध्दी माध्यमांची भूमिका कशी महत्वाची आहे, याबाबत विस्तृतपणे माहिती दिली. केंद्र आणि राज्य यांच्यामधील संबंध तसेच कायदा करण्याची प्रक्रिया याबाबत उपस्थितांना संबोधित केले. भारतामध्ये पंचायती राज व्यवस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या त्रिस्तरीय रचनेमधील राजकीय पक्षांची व प्रशासनाची भूमिकेचे महत्व विशद केले. भारतातील राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सुशासन आणण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुधारणांबाबतही आपले मत व्यक्त केले.