गडचिरोली,दि.24: कोव्हीड-१९ च्या अनुषंगाने सरकारने लॉकडाऊन केल्यानंतर अनेक जण जिथल्या तिथे अडकले. त्यातील कुणी मजूर होते, तर कुणी कामगार. कुणी कर्मचारी, तर कुणी व्यावसायिक. पण, देसाईगंज येथे चक्क लग्नाचे वऱ्हाडच अडकले. महिनाभरापासून या वऱ्हाडाचा पाहुणचार केंद्रीय राखीव दलाचे जवान करीत आहेत.
मार्चच्या चौथ्या आठवड्याड्याच्या सुरुवातीला देसाईगंजच्या डॉ.आंबेडकर वॉर्डात दोन लग्न होते. त्यासाठी २३ मार्चला एक वऱ्हाड भंडाऱ्याहून आले, तर दुसरे चंद्रपूरहून आले. परंतु शासनाने लॉकडाऊन केल्यानंतर त्यांना स्वगावी जाता येईना. या दोन्ही वऱ्हाडांमध्ये बुजुर्ग स्त्री, पुरुषांसह बालकेही होती. दोन्हीकडची संख्या ४० च्या आसपास. दोन्ही वधूंचे पिता मजूर. त्यामुळे कशीतरी त्यांच्या निवासाची व्यवस्था झाली. काही दिवस भोजनही मिळाले. एवढ्यात सीआरपीएफच्या १९१ बटालियनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी यांना दोन वऱ्हाड देसाईगंजमध्ये थांबल्याची बातमी कळली. लागलीच त्रिपाठी यांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्याचे ठरवले.
लॉकडाऊन झाल्यापासून सीआरपीएफचे जवान त्यांना भोजनाची पॉकिटे पोहचवून देत आहेत. सोबतच मुलांना दूध व बिस्किटेही खाऊ घालत आहेत. केवळ वऱ्हाडीच नव्हे तर वॉर्डातील गरीब नागरिकही आपली भूक भागवीत आहेत. पोटात कावळे ओरडण्याची वेळ झाली की सीआरपीएफची गाडी वऱ्हाड्यांच्या मुक्कामावर धडकते. तिथे मग सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत भोजन दिले जाते. शहरभरात दररोज पाचशे ते सहाशे वऱ्हाड्यांना सीआरपीएफ अन्नदान करीत आहे. एवढंच नाही तर शहरातील मंदिरं, मशिदी, दवाखाने, एटीएम अशा सार्वजनिक ठिकाणांचं सॅनिटायझेनही सीआरपीएफ करीत आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकसेवेची संधी मिळाल्याचं समाधान मोठं आहे, असे सीआरपीएफचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी यांनी सांगितलं.
स्वत:चं लग्न विसरुन एएसआय सोनू वऱ्हाड्यांच्या सेवेत
सीआरपीएफचे सहायक फौजदार सोनू यांचे ५ एप्रिलला लग्न होते. परंतु लॉकडाऊनमुळे ते स्वत:चे लग्न करु शकले नाही. त्यामुळे गावात अडककेल्या वऱ्हाड्यांना भोजनदान करण्यात ते व्यस्त झाले.





