मराठी बोलाल तरच मिळेल रिक्षा परवाना – परिवहन मंत्री दिवाकर रावते

0
12

मुंबई, दि. १५ – मराठी बोलता येत नसेल तर मुंबईत रिक्षा चालवण्याचा परवाना मिळणार नाही असा आदेश परिवहन मंत्रालयातर्फे काढण्यात आला आहे. मुंबईत रिक्षा चालवायची असेल तर रिक्षावाल्यांना मराठी येणं बंधकारक असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली असून यामुळे आता नवा वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत.
येत्या काळात मुंबईत १ लाख नव्या रिक्षासांठी परवाने देण्यात येणार आहेत. तसेच परवाने रद्द झालेल्या सुमारे १ लाख ४० हजार ऑटोरिक्षांना सरकारकडून पुन्हा परवाने देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून त्यासाठी १ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
ज्या रिक्षाचालकांना मराठी भाषा बोलता येईल त्यांनाच रिक्षा चालवण्याचा परवाना देण्यात येणार आहे. १ नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार असून परवाना देण्यापूर्वी रिक्षा चालकांची मराठी भाषेची परीक्षा घेण्यात येणार आहे. ते जर त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले तरच त्यांना परवाना देण्यात येईल, अन्यथा नाही असे रावते यांनी स्पष्ट केले आहे.