खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते यांचा तुटवडा भासू नये यासाठी सुक्ष्म नियोजन करावे- पालकमंत्री उदय सामंत

0
28
  • ९ ते ११ मे कालावधीत कुडाळ येथे कृषि प्रदर्शनाचे आयोजन
  • पुढील वर्षी होणाऱ्या सिंधु महोत्सवास जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करु

सिंधुदुर्गनगरी दि. 30 : खरीप हंगाम जवळ आला असून शेतकऱ्यांना बि-बियाणे खते तसेच कृषि पुरक औषधे याचा तुटवडा भासू नये यासाठी कृषि विभागाने आवश्यकत्या सर्व बाबींची साठवणूक करावी तसेच मागणी प्रमाणे पुरवठा होईल यासाठी सुक्ष्मपणे नियोजन करावे असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली कृषि विभागाची खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकरी, प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस.एन. म्हेत्रे, आदी उपस्थित होते.

खरीप हंगाम काळात शेतकऱ्यांना बियाणांची व खतांची आवश्यकता असते अश्यावेळी ती कमी पडू नयेत. यासाठी कृषि विभागाने खबरदारी घ्यावी, असे आदेश देवून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, कृषि विभागाच्या माध्यमातून रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करावे. जिल्ह्यामध्ये ९, १० व ११ मे २०२२ या काळात कुडाळ येथे कृषि महोत्सवाचे आयोजन केले आहे. याचे योग्य पध्दतीने नियोजन करावे. तसेच येत्या काळात सिंधु महोत्सवांचेही आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्हा ग्राम कृषि विकास आराखडा सन २०२२ चा आराखडा सादर करताना सांगितले, जिल्हा भौगोलिक क्षेत्र ५ लाख ३ हजार ९५० हेक्टर आहेत. यामध्ये एकूण लागवडीखालील क्षेत्र २ लाख ५ हजार १३५ हेक्टर. तर हंगामी पिकाखाली खरीपाचे क्षेत्र ५९ हजार ३९० हेक्टर आहेत. तसेच ऊस लागवड २ हजार ७९८ हेक्टर क्षेत्र आहे. असे एकूण ६२ हजार १८८ हेक्टर लागवडीचे क्षेत्र आहे. त्याचबरोबर फळ पिकाखाली १ लाख ४२ हजार २४७ हेक्टर क्षेत्र आहे. लागवडी लायक पड क्षेत्र ५९ हजार ५६३ हेक्टर आहे. तर जंगल क्षेत्र ५५ हजार ५६६ हेक्टर आहे. कवळकाड ४० हजार ५३४ हेक्टर आहे. खडकाळ व लागवडीस अयोग्य क्षेत्र १ लाख २१ हजार ८७८ हेक्टर आहे. अकृषक क्षेत्र २१ हजार २७४ हेक्टर आहे. जिल्ह्यामध्ये एकूण जमीन धारक अत्यल्प – २ लाख ४० हजार ७१९, अल्प- ४२ हजार १२६, इतर- १८ हजार ५४ असे एकूण ३ लाख ८९९ आहे.

जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने भात, नागली इतर तृणधान्ये, कडधान्य, तेलबिया, इत्यादी पिके घेतली जातात. ख्ररीप हंगाम २०२२-२३ चा १ लाख ९३ हजार ३१८ इतका उत्पादन लक्षांक आहे. सन २०२०२-२३ साठी खत पुरवठा मागणीमध्ये युरीया, डीएपी, एसएसपी, एमओपी व संयुक्त व मिश्र खतांची मंजूर आवटंन १२५०० क्विंटल आहे. जिल्ह्यात  कृषी निविष्ठा विक्री परवाने परवान्याची संख्या ८२१ आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ मध्ये गुणवंत्ता नियत्रंणासाठी उपाययोजना म्हणून कृषि निविष्ठा उपलब्धता व गुणवंत्ता नियत्रणांसाठी एकूण ९ भरारी पथके व तक्रार निवारण कक्ष निर्माण करण्यात आले असून यामध्ये एक जिल्हास्तरावर व आठ तालुकास्तरावर कक्ष स्थापन केले आहे. त्याचबरोबर कृषि विभागामार्फत जिल्ह्यात ३०१  ग्राम कृषि विकास समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. कृषि विभागाच्या माध्यमातून क्रॉप सॅप/ हॉर्टसॅप अंतर्गत किड व रोगांचे नियोजन, पिक प्रात्यक्षिके नियोजन करण्यात येते. त्याचबरोबर पिक विमा योजना पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेतून शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतात. असे कृषि विभागामार्फत सांगण्यात आले.

000000

जिल्हा क्रीडा संकुल सक्षम बनविण्यासाठी  विस्तुत आराखडा तातडीने सादर करावा – पालकमंत्री उदय सामंत

  • सिंथेटीक ट्रॅक साठी सहा कोटीचा निधी उपलब्ध निविदा प्रक्रिया तातडीने राबवा.
  • बॅडमिंटन कोर्टसाठी १ कोटी ५० लाखांचा निधी
  • जिल्ह्यामध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे.

सिंधुदुर्गनगरी दि. 30 (जि.मा.का) : जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्र सक्षम व्हावे व जिल्हावासियांना खेळांच्या चांगला सुविधा उपलब्ध व्हाव्यात. जिल्ह्यातून चांगल्या दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत. यासाठी जिल्हा क्रीडा संकुल अधिक सक्षम करण्यात येत आहे. खेळांच्या विविध सुविधासाठी  जिल्हासाठी शासनाकडून १५ कोटी रुपये मंजुर झाले आहे. या निधीचा बाबतचा आराखडा तातडीने तयार करुन शासनास सादर करावा. जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटीक ट्रॅक तयार करण्यासाठी ६ कोटी रुपये व बॅडमिंटन कोर्टसाठी १ कोटी ५० लाख रुपये मंजुर करण्यात आले आहे. या कामाची निविदा तातडीने काढून ही कामे सुरु करावीत असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकरी, प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, क्रीडा अधिकारी अजय शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्हा मुख्यालय स्तरावर अत्यंत चांगल्या प्रतीची जिम सुरु करण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ही जिम सुरु करण्यासाठी क्रीडा विभागाने तातडीने प्रस्ताव तयार करावा  असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी देवून ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात मॅटवरील कबड्डीसाठी एकच संच सध्या उपलब्ध आहे. तरी आणखी तीन मॅट संच खरेदी करण्यासाठी क्रीडा विभागाने प्रस्ताव तयार करुन प्रशासनास सादर करावा. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच जिल्ह्यामध्ये विविध  क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे.  तसेच या स्पर्धा आयोजित करतांना स्थानिक लोकप्रतिनिधींना अवगत करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिटन हॉलची दुरुस्ती जुने पत्रे बदलणे  यासाठी रु. १ कोटी ५० लाख, जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण तलाव दुरुस्ती साठी रु. ३ लाख ५५ हजार व  जिल्हा क्रीडा संकुल येथील संरक्षक भिंती दुरुस्ती, कमान व गेट बसविणे इ. कामे करण्यास पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजुरी दिली. ही कामे करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्यात यावेत असेही ते म्हणाले.

०००००

कोविडचा संभाव्य धोका टाळण्यासाठी लसीचा दुसरा व बुस्टर डोस नागरिकांनी तातडीने घ्या – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्हा लसीकरणात राज्यात चौथ्या क्रमांकावर

बुस्टर डोस घेण्यासाठी पात्र नागरिकांनी पुढे यावे पालकमंत्र्याचे आवाहन

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये तरी चौथी लाट येणाच्या धोका संभवत नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून कोविड-१९ नियमांचे पालन करावे. त्याचबरोबर लसीचा दुसरा  व बुस्टर डोस तातडीने पात्र नागरीकांनी घ्यावा. असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली कोविड आजार व लसीकरण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकरी, प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्यामध्ये ९३ टक्के नागरिकांचा पहिला डोस पुर्ण झाला आहे. तर ८३ टक्के नागरिकांचा दुसरा डोस पुर्ण झाला आहे. तसेच जिल्हा लसीकरणामध्ये राज्यात पहिल्या ४ क्रमांकात असल्याचे यावेळी सांगुन पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात केवळ दोन टक्केच लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. बुस्टर डोसचे प्रमाण वाढावे यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहिमेचे आयोजन करावे. त्याचबरोबर कोविड चाचण्याचेही प्रमाण वाढविण्यात यावे. व कोविड बाबत जनजागृती करण्यात यावी असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी आरोग्य विभागाने जिल्ह्यात सध्या सक्रीय रुग्ण २ असल्याचे सांगून आतापर्यंत ५५ हजार ८५१ डिस्चार्ज झाले असून आतापर्यंत १५३३ मृत्यू झाले असल्याचे सांगितले. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७.३३ असल्याचे यावेळी सांगितले. जिल्ह्यात एकूण ११स्वॅब टेस्टिंग कलेक्शन सेंटर असून यामध्ये ४ आरटीपीसीआर तर ७ रॅपीड ॲन्टींजन टेस्ट सेंटर आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ६ लाख ३० हजार ८९५ स्वॅब टेस्टिंग करण्यात आले आहे. यात आरटीपीसीआर  ३ लाख ३७ हजार ६६० तर रॅपीड ॲन्टींजन टेस्ट २ लाख ९३ हजार २३५ करण्यात आले आहे.

लसीकरण मोहिमे अंतर्गत जिल्ह्यात एकूण 9 हजार ८५७ हेल्थ वर्करनी पहिला डोस तर ८ हजार ३१३  जणांनी दुसरा डोस घेतला.  9 हजार ९९३ फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर ९ हजार २३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील १ लाख ३९ हजार ४१३ व्यक्तींनी पहिला डोस तर १ लाख १७ हजार २८१  व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे.  45 वर्षावरील 1 लाख ६४  हजार ७९४  नागरिकांनी पहिला डोस तर १ लाख  ४६ हजार ९४५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटातील १८ हजार २५५ पहिला डोस तर १० हजार ५६५ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील २७ हजार ११६ जणांनी पहिला डोस तर २१ हजार ९३१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.  18 ते 44 वर्षे वयोगटातील २ लाख ६५ हजार ९७७ जणांनी पहिला डोस तर २ लाख २९ हजार ७३४ व्यक्तींनी दुसरा डोस  घेतला आहे.

000000

नरडवे प्रकल्प तातडीने पूर्ण होण्यासाठी संबंधित सर्व प्रशासकीय विभागांनी गतीने काम करावे – पालकमंत्री उदय सामंत

नरडवे प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्वपुर्ण प्रकल्प असून हा प्रकल्प तातडीने पुर्ण होण्यासाठी संबंधित सर्व प्रशासकीय विभागांनी गतीने कामे करावीत. तसेच नरडवे ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करावे असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नरडवे प्रकल्प आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकरी, प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जलसंपदा विभागाचे अभियंता श्री. थोरात, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, तसेच नरडवे ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वपुर्ण असलेला हा प्रकल्प पुर्णत्वास यावा यासाठी गेले कित्येक दिवस प्रयत्न सुरु आहेत.  नरडवे प्रकल्प हा राज्यामध्ये असा एकमेव प्रकल्प आहे ज्यासाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला हा एक मोठा प्रकल्प असून हा प्रकल्प पुर्णत्वास आल्यास जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात याचा लाभ होणार आहे. सदरच्या प्रकल्पासाठी रस्त्याचे काम संबंधित यंत्रणांनी तातडीने सुरु करावे. तसेच मदतीसाठी २९९ ची यादी  तातडीने तयार करावीत तसेच ६५ टक्के न भरलेली रक्कम यांचीही यादी तातडीने प्रशासनाने ग्रामस्थांना सोबत घेऊन तयार करावी असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. तसेच नरडवे गावासाठी देण्यात येणाऱ्या पर्यांही मार्गाचे तातडीने डांबरीकरणही करावे. यासाठी ग्रामस्थांनीही प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.