अतिरिक्त मुख्य सचिव सहाय विरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

0
7

मुंबई – नैराश्यग्रस्त मुलाने तातडीने घरी यावे असा फोन केल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय यांनी उपसचिव राजेंद्र घाडगे यांना घरी जाण्यास परवानगी न दिल्याने घाडगे यांच्या मुलाने आत्महत्या केली. गुरुवारी मंत्रालय कर्मचाऱ्यांनी मंत्रालयात सहाय यांच्याविरोधात आंदोलन केले. या प्रकरणाची मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय चौकशी करणार आहेत.

कृषी विभागात उपसचिव म्हणून घाडगे कार्यरत आहेत. सातवीत शिकत असलेला त्यांचा मुलगा अवधूत गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात होता. शुक्रवारी त्याच्यात व आईमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. घाडगे यांच्या पत्नीने व मुलाने फोन करून घाडगेंना लवकर घरी येण्यास सांगितले. आज लवकर घरी आला नाहीत तर मी आत्महत्या करेन, असेही अवधूतने घाडगेंना फोनवरून बजावले होते. घाडगे यांनी सहाय यांच्याकडे घरी जाण्याची परवानगी मागितली. मात्र, त्यांनी घरी जाण्याची परवानगी दिली नाही. घाडगे घरी जाईपर्यंत त्यांच्या मुलाने आत्महत्या केली. सहाय यांच्या मनमानीपणामुळे एका अधिकाऱ्याला त्याचा मुलगा गमवावा लागल्याने मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना भेटून कर्मचाऱ्यांनी निवेदनही दिले. हा प्रकार दुर्दैवी आहे. कृषिमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन्ही बाजू समजून घेणार असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. उपसचिव घाडगे हे सोलापूर येथील सांगोला या त्यांच्या गावी आहेत. दोघांचेही म्हणणे ऐकल्यानंतरच याबाबत मत व्यक्त करता येईल, असे स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले.