गायीला ‘माता’ मानण्याचा सल्ला देणारे अाहेत कोण? -शरद पवार

0
15

पुणे- ‘गायीला आई न म्हणणाऱ्यांनी देश सोडून जावे, असे देशातल्या एका मुख्यमंत्र्याकडून ऐकायला मिळाले. गायीचा आदर आम्ही सर्वच जण करतो. पण आमच्या आईच्या जागी गायीला माता म्हणण्याचा आदेश द्यायचा अधिकार यांना कोणी दिला? देश यांच्या मालकीचा आहे का,’ असा सवाल माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केला.
ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृह राज्यमंत्री डॉ. भाई वैद्य यांना पवारांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार देऊन गाैरविण्यात अाले. या वेळी अध्यक्षपदावरून पवार बाेलत हाेते. ‘त्रिदल’च्या वतीने गेल्या २८ वर्षांपासून हा पुरस्कार दिला जाताे. संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष खासदार शरद यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्ड आदींची प्रमुख उपस्थिती हाेती. ‘त्रिदल’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले.
‘देशाची स्थिती आज बिकट आहे. काश्मीर धुमसतो आहे. काश्मीर समस्येने स्वातंत्र्यानंतर देशाला सर्वाधिक त्रास दिला आहे. सत्य बोलण्यावर बंधने आली आहेत. लोकांच्या भावना कशानेही दुखावू लागल्या आहेत. सामाजिक विषमतेचा देशाचा सर्वात जुना आजार कायम आहे. काही लोक अजूनही विसाव्या शतकातच जगत आहेत. चीन, युरोप कुठे पोचला आणि आपण कुठे याचा विचार करावा लागेल,’ याकडे शरद यादव यांनी लक्ष वेधले.
डॉ. वैद्य म्हणाले, की ‘इसिसच्या रुपाने धर्मवादाचा धोका जगभर धुमाकूळ घालतो आहे. भारतातही धर्माधिष्ठित राजकारणाची भूमिका मांडणारे लोक आहेत. जगभर भयानक विषमता निर्माण झाली आहे. या आव्हानांचा सामना तरुणांना करावा लागणार आहे. आर्थिक वितरण आणि जात निर्मूलनाचे कामही तरुणांना करायचे आहे.’