नोटाबंदीवरून विरोधक आक्रमक, अध्यक्षांच्या आसनासमोर केली घोषणाबाजी

0
13

नागपूर,दि.05– आजपासून गुलाबी थंडीत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे वातावरण पहिल्या दिवशी चांंगलेच तापले आहे. विधानसभेच्या कामकाजाला विरोधकांच्या गदारोळाने सुरुवात झाली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात नोटबंदीबाबतचा स्थगन प्रस्ताव फेटाळला गेला. त्यामुळे विरोधक चांगलेच आमक्रमक झाले.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नोटबंदीविरोधात स्थगन प्रस्ताव आणला. मात्र, तो विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला. विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी केली. या गोंधळातच सरकारने सभागृहात पुरवणी मागण्या सादर केल्या. सरकारचा निषेध करत विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला.

दुसरीकडे, विधानपरिषदेतही नोटबंदीचे पडसाद उमटले. या मुद्यावर स्थगन प्रस्तावाची मागणी विरोधकांनी विधानपरिषदेत केली. मात्र, तीही फेटाळली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटबंदीचा निर्णय सामान्य आणि कष्टकरी यांच्यासाठी मारक असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर तोफ दागली. सरकारच्या नोटाबंदीचा परिणाम, जनतेला होणारा त्रास या संदर्भात धनंजय मुंडे यांनी सभागृहात माहिती दिली.

नोटबंदी आणि सहकारी बँकांवरच्या निर्बंधांमुळे सामान्यांची तारांंबळ उडाल्याचे सांगत काँग्रेसचे नेते नारायण राणेंनी सरकारवर सडकून टीका केली. दुसरीकडे, नोटाबंदी निर्णयानंतर 30 दिवसांत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण? असा जाब माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षाला विचारला. तसेच दहशतवाद्यांकडे नवीन नोटा आल्या कशा? असा खोचक सवाल अजित पवार यांनी केला आहे.