मुख्यमंत्र्यांना पारदर्शकतेपेक्षा खुर्ची प्यारी – अशोक चव्हाण

0
10

मुंबई दि. 4 – राज्यातले सरकार आणि स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी पारदर्शकतेचा मुद्दा गुंडाळून ठेवत महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांचा विश्वासघात केला आहे. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून भाजपने माघार घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या या माघारीवर प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की, सरकार वाचवण्यासाठी भाजपने पारदर्शकतेचा मुद्दा गुंडाळून ठेवला आहे. मुंबई महापालिका भ्रष्टाचारमुक्त करण्यापेक्षा राज्यातले सरकार वाचवणे ही प्राथमिकता असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी आपली खुर्ची टिकवण्याला महत्त्व दिले आहे. शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांकडून प्रचारात झालेले आरोप प्रत्यारोप हे फक्त मतदारांचे लक्ष विचलीत करण्यासाठी केलेले नाटक आहे, हे आमचे म्हणणे खरे ठरले तर आहेच परंतु भाजप हा जनतेकरिता विश्वासघातकी पक्ष आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. अच्छे दिनच्या नावाने देशाची,6500 कोटी रूपयांच्या नावाने कल्याण-डोंबिवलीकरांची आणि पारदर्शकतेच्या नावावर मुंबईकरांची फसवणूक भाजपने केली आहे असे खा. चव्हाण म्हणाले.
मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारात भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. शिवसेना हप्तेखोरांचा पक्ष असून मुंबई महापालिकेतून मिळणा-या टक्केवारीवर शिवसेना चालते अशी टीका भाजप नेत्यांनी केली होती. मग आता निवडणूकीतून माघार घेऊन या माफिया, हप्तेखोर,भ्रष्टाचारी लोकांच्या हातात मुंबईकरांना का सोपवले? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना द्यावे असे खा. चव्हाण म्हणाले. गेल्या 22 वर्षात शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांनी मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. यापुढेही राज्यात, केंद्रात आणि मुंबई महापालिकेत एकमेकांच्या सहकार्याने हे चालूच राहणार आहे असे खा. चव्हाण म्हणाले.