संरक्षण कायद्यामुळे पत्रकारांना सत्य मांडण्याचे बळ – .खोतकर

0
17

नरेश तुप्तेवार

नांदेड,दि.21 :- पत्रकारितेतून लोकांसमोर सत्य मांडण्याचे दायित्त्व असते. हे दायित्त्व निभाविण्यासाठीचे बळ पत्रकार हल्ला विरोधी कायद्यातून मिळेल, असे प्रतिपादन नांदेड चे पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती नांदेड अंतर्गत जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांच्यावतीने आयोजित सत्कार समारंभी २०एप्रिल रोजी नांदेड येथे व्यक्त केले. राज्य सरकारने पत्रकारांवरील हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत व अभिनंदन करण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती नांदेड अंतर्गत जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांच्यावतीने पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा सत्कार करण्यात आला.

नांदेड येथील मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृहातील सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील-आष्टीकर, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव विजय जोशी, मराठी पत्रकार संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे,प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी,याशिवाय विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार आदींही उपस्थिती होते. या सत्कार सोहळ्यास संबोधित करतांना ना.अर्जुन खोतकर पुढे म्हणाले की, पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता, राज्याच्या हिताकरिता आणि विकासाची दीशा दाखविण्यासाठी लेखणीच्या माध्यमातून काम करीत असतात. जगात भारतीय पत्रकारितेचे एक आगळे वेगळे महत्त्व आहे. त्यामुळेच या पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणूनही ओळखले जाते. यातून नेतृत्त्वालाही दीशा देण्याची पत्रकारितेने भुमिका बजावली आहे. पत्रकार सामान्यांच्या न्याय्यासाठी लढा देत असतात. यातूनच प्रशासन, शासन आणि लोकप्रतिनिधींनाही धोरणे आखता येतात. त्यामुळेच सरकार म्हणून पत्रकारांना संरक्षण देण्याची जबाबदारी येते. सत्य असेल, ते लोकासमोर मांडण्याचे दायित्त्व पत्रकारितेकडे येते. हे दायित्त्व पार पाडण्यासाठीचे बळ या संरक्षण कायद्यामुळे मिळेल, असा विश्र्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी ना.खोतकर यांनी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस सरकारने पत्रकारांच्या कल्याणासाठी अनेकविध प्रयत्नही केल्याचे नमूद केले. तसेच या सत्काराबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनाही अवगत केले जाईल, असे सांगितले.विविध पत्रकार संघटनांच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ देऊन ना. खोतकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमात पत्रकार किरण कुलकर्णी, नंदकुमार कांबळे, कमलाकर बिराजदार,ननरेश तुप्तेवार, विश्र्वनाथ देशमुख, भास्कर धम्मा, अब्दूल सत्तार, रुपेश पाडमुख, कालिदास जहागिरदार आदींच्या हस्तेही सत्कार झाला. पत्रकार विजय जोशी यांनी प्रास्ताविक केले व आभारही मानले. यावेळी विविध पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार आदी उपस्थित होते