वर्धा,दि.30- महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली निकषांची चाळणी लावून शेतकऱ्यांसोबत पोरखेळ सुरु केला असून “शेतकर्यांना कर्ज माफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यायची आहे” अशा आशयाची वेळोवेळी वक्तव्ये करणाऱ्या मुख्यमंत्री मा. फडणवीसांनी प्रत्यक्षात मात्र कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची घोर फसवणूकच केलेली आहे. त्याच्या निषेधार्थ ३ सप्टेंबरला युगात्मा शरद जोशी यांच्या ८२ व्या जन्मदिवशी वर्धा येथील शास्त्री पुतळ्याजवळ सामुहिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांनी दिली.
दि. २८ ला हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. बैठकीला मधुसूदन हरणे,दत्ता राउत, साहेबराव येडे, अजय राऊत, बबनराव अवचट, मन्साराम कोल्हे, रमेश बोबडे, हेमराज इखार यांनीही मार्गदर्शन केले. गंगाधर मुटे पुढे म्हणाले कि,देशातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही असे शरद जोशी नेहमी म्हणायचे पण क्रूर नियतीने अवेळीच डाव साधला आणि त्यांचे स्वप्न अधुरे राहून गेले. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करून सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारी कर्जमुक्ती जाहीर करण्यास राज्यसरकारला भाग पाडणे, हीच शरद जोशींना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल.
शेतकऱ्यांवरील सर्व कर्जे अनैतिकच असल्याने विनाअट, विनानिकष सातबारा पूर्णपणे कोरा करा, वीज बिलातून शेतकऱ्यांची पूर्णतः मुक्तता करा, शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी निर्यात शुल्क वाढवणे, निर्यातीवर बंदी अथवा निर्बंध लादणे, चढ्या दराने परदेशातून शेतमालाची आयात करणे,आंतरराज्य वाहतुकीवर बंदी घालणे, व्यापारी साठ्यांवर मर्यादा घालणे, विक्री किमतीवर मर्यादा घालणे आदी उपाय कायमस्वरूपी बंद करा, शेतीला जाचक ठरणारे कायदे रद्द करा, शरद जोशी प्रणीत मार्शल प्लान (भारत उत्थान कार्यक्रम) लागू करा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे सामुहिक उपोषण राज्यभर केले जाणार असून या उपोषणात राज्यातील सुमारे १५ हजार शेतकरी सहभागी होणार असल्याने हे आगळेवेगळे आंदोलन ठरणार असून देश पातळीवर या आंदोलनाची दखल घेणे शासनाला भाग पडेल, असा आशावादही गंगाधर मुटे यांनी या प्रसंगी व्यक्त केला.