साडे सात हजार ग्रामपंचायतींसाठी 7 आणि 14 ऑक्टोबर रोजी मतदान

0
21
OLYMPUS DIGITAL CAMERA

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील साडे सात हजार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 7 हजार 576 ग्रामपंचायतींसाठी दोन टप्प्यात 7 आणि 14 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यात ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचाही समावेश आहे.पहिल्या टप्प्यात विविध 18 जिल्ह्यांतील 3 हजार 884, तर दुसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यातील 3 हजार 692 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत केली. पुर्व विदर्भातील नागपूर विभागातंर्गतच्या सर्वच जिल्ह्यात दुसर्या टप्यात 14 आक्टोंबरला निवडणुका घेण्यात येणार आहेत.यामध्ये गोंदिया,भंडारा,नागपूर,वर्धा,चंद्रपूर व गडचिरोलीतील काही ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत राज्याभरातील सुमारे 8,500 ग्रामपंचायतींच्या मुदती संपत आहेत. यापैकी ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 114 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होत आहे.नोव्हेंबर आणि डिसेंबर 2017 मध्ये मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. जानेवारी आणि फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या 689 आणि नव्याने स्थापित झालेल्या 37 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.

राजकीय पक्षांच्या चिन्हावर ग्रामपंचायत निवडणूक नाही

थेट सरपंचपदासाठी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर मतदान होत असल्याने आचारसंहितेबाबत विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका मतदाराला कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त चार मते द्यावी लागतील. एक मत थेट सरपंचपदासाठी असेल; तर अन्य मते आपल्या प्रभागातील सदस्यपदांसाठी द्यावी लागतील. पूर्वीप्रमाणेच सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठीही निवडणूक चिन्ह म्हणून मुक्त चिन्हांचा वापर केला जाईल. राजकीय पक्षांसाठी आरक्षित असलेल्या चिन्हांचा या निवडणुकीत वापर होणार नाही.

सरपंचपदासाठी फिकी निळी मतपत्रिका

पहिली मतपत्रिका सरपंचपदाच्या जागेसाठी असेल. सरपंचपदासाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका निळा असेल. सदस्यपदाच्या मतपत्रिकांचे रंग पूर्वीप्रमाणेच असतील. अनुसूचित जातीच्या जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका गुलाबी, अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका हिरवा, तर नागरिकांच्या मागासप्रवर्ग जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका पिवळा असेल. सर्वसाधारण जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग पांढरा असेल.

सरपंचपदासाठी शिक्षणाची अट

सरपंचपदाची उमेदवार असलेली व्यक्ती 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असल्यास किमान 7 वी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांना 7 वी इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने तसे प्रमाणित करणे आवश्यक राहील.

आचारसंहिता लागू

या सर्व ठिकाणी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. ज्या जिल्ह्यांत एकूण ग्रामपंचायतींपैकी 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू असेल. त्याचप्रमाणे ज्या तालुक्यात 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा तालुक्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू राहील. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या गावांमध्येसुद्धा आचारसंहिता लागू राहील.

निवडणूक नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकास कामांवर कोणतेही निर्बंध राहणार नाही. त्यांना फक्त निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही कृती करता येणार नाही. निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. मतदानाच्या दिवशी संबंधित ठिकाणी जिल्हाधिकारी स्थानिक सुट्टी जाहीर करतील.

पहिला टप्पा

पहिल्या टप्प्यासाठी नामनिर्देशनपत्रे 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2017 या कालावधीत दाखल करता येतील. ते 27 सप्टेंबर 2017 पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचं वाटप होईल. 07 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 9 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल.

दुसरा टप्पा

दुसऱ्या टप्प्यासाठी नामनिर्देशनपत्रे 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2017 या कालावधीत दाखल करता येतील. ते 05 ऑक्टोबर 2017 पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचं वाटप होईल. 14 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी केवळ 3.00 वाजेपर्यंत असेल. या सर्व ठिकाणी 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल.

पहिल्या टप्यात निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या : नाशिक- 170, धुळे- 108, जळगाव- 138, नंदुरबार- 51, अहमदनगर- 204, औरंगाबाद- 212, बीड- 703, नांदेड- 171, परभणी- 126, उस्मानाबाद- 165, जालना- 240, लातूर- 353, हिंगोली- 49, अमरावती- 262, अकोला- 272, यवतमाळ- 93, वाशीम- 287 आणि बुलडाणा- 280. एकूण- 3,884.

दुसऱ्या टप्यात निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या :

नागपूर- 238, वर्धा- 112, चंद्रपूर- 52, भंडारा- 362, गोंदिया- 353, ठाणे- 41, पालघर- 56, रायगड- 242, रत्नागिरी- 222, सिंधुदुर्ग- 325, पुणे- 221, सोलापूर- 192, सातारा- 319, सांगली- 453, कोल्हापूर- 478,  आणि गडचिरोली- 26. एकूण- 3,692.