कोल्हापूर,दि.08(विशेष प्रतिनिधी)-कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी जातीपातीची व्यवस्था मोडून काढण्यासाठी आपल्या सामाजिक कामातून गंगाधर कांबळे याला हॉटेल काढून दिले. तेथे ते चहा विकत होते. एक हे जातीव्यवस्था मोडून काढण्यासाठी चहा विकणे होते. ते समाजातील भेदभाव मोडून काढण्यासाठी होते. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी दावा केला होता कि ते चहा विकत होते. त्यांनी चहा विकला कि नाही ते माहिती नाही परंतु आता ते देश नक्कीच विकत आहेत, अशी टीका आज जेएनयु विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याने आज कोल्हापुरात केली.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने आज कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहात ही सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला सुरुवात होण्याआधी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कन्हैया कुमारच्या विरोधात नाट्यगृहाबाहेर जोरदार निदर्शने केली. त्याला प्रतिउत्तर म्हणून ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
त्यानंतर सुरु झालेल्या सभेत कन्हैया कुमार म्हणाला, माझ्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी बाहेर निदर्शने करत आहेत ते मला देशद्रोही मानत आहेत. मला कोल्हापुरात यायला मनाई करण्याची मागणी करत आहेत.मी जर देशद्रोही आहे तर मग मी दिल्लीत सुद्धा राहू शकत नाही. ज्या विद्यापीठात मी राहतो.त्या विद्यापीठाला नॅक ने सर्वात उत्तम विद्यापीठाचा दर्जा दिला आहे.ज्याला राष्ट्रपती पुरस्कार हि मिळाला आहे.त्या विद्यापीठात राहण्याचा आम्हाला अधिकार नाही का ? असा सवाल करत मी जर खरच देशद्रोही असेन तर यांच्या सरकारने माझ्यावर पोलिसात गुन्हा दाखल करावा.आरोपपत्र दाखल करावे मी देशविरोधी घोषणा केल्याबद्दल मला तुरुंगात पाठवावे, या संघटनांना जर वृत्तपत्रांसाठी इतकाच शौक असेल तर त्यांच्यासोबत सेल्फी वुईथ मोदी काढा त्यांच्यावर दबाव आणा कारण या देशात पंतप्रधान, उपपंतप्रधान,राष्ट्रपती, देशात आणि 18 राज्यात सरकार यांचेच तर मग माझ्यावर आरोपपत्र का दाखल करू शकत नाही असा जोरदार प्रश्न विचारून कन्हैया म्हणाला की, यांना माहित आहे की मला दोषी मानण्यासारखे यांच्याकडे काहीच नाही. संपूर्ण देशभरात भ्रष्टाचारी मंत्र्यांवर आणि भाजपाविरोधी नेत्यांवर कारवाई करण्यात सीबीआय आणि अन्य यंत्रणा इतक्या कुशल आहेत, तर मग यांनी मला कोल्हापूरला कसे सोडले असते.त्यामुळे यांनी एकदा सुरुवात केली तर आता त्यांना मागे येता येणे शक्य नाही म्हणून ते बोलत आहे. जसे या देशाचे पंतप्रधान सुद्धा बोलण्यासाठीच बोलत आहेत,काम होवो न होवो मन कि बात सांगत आहेत अशी खिल्ली कन्हैया कुमारने उडवली.
नोट बंदीनंतर 3 लाख करोड काळा पैसा परत आल्याचे सांगितले जात आहे मात्र असा कोणताही काळा पैसा परत आला नाही असे रिझर्व्ह बँक सांगत आहे. जर खरच काळा पैसा परत आला आहे तर मोदीजी तर ,बुलेट ट्रेनसाठी एक लाख कोटीचे जपानकडून कर्ज का घेता ? असा सवाल कन्हैयाकुमारने सरकारला केला. देशात नोटबंदी नंतर तणावाचे वातावरण वाढीला लागला आहे असे सांगून तो म्हणाला की ज्यांच्याजवळ काळा पैसा आहे त्यांना तो कसा लपवायचा याची चांगलीच माहिती आहे.
काम करण्याच्या प्रयत्नात तीन वर्षे अशीच निघून गेली गेली. या देशात या तीन वर्षात काय महिलांवरील अत्याचार कमी झाला ? का नक्षलवाद कमी झाला? भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी झाले का ? कोणते काम या सरकारने पूर्ण केले असा प्रश्न त्याने यावेळी उपस्थित केला. याउलट आता या देशातले ज्यांना भ्रष्टाचाराची विद्यापीठे म्हणता येईल अशा नेत्यांना भाजप आपल्याकडे वळवत आहे. या देशात मोदी आणि सरकारच्या विरोधात बोलले, प्रश्न विचारला की देशद्रोहाचा शिक्का मारला जातोय. त्यामुळे देशाच्या नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचे त्याने सांगितले
शेतकरी आत्महत्या, सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, समान शिक्षण यांसारख्या प्रश्नापासून दूर नेण्यासाठी भाजपकडून राम मंदिर, ताजमहल सारखे मुद्दे समोर आणले जात आहेत असेही तो म्हणाला.