फाशीच्या शिक्षेमुळे समाजातील अपप्रवृत्तींना जरब बसेल- मुख्यमंत्री

0
7

मुंबई, दि. 29 : कोपर्डी अत्याचार प्रकरणातील तीन आरोपींना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेमुळे समाजातील अपप्रवृत्तींना जरब बसण्याबरोबरच न्यायपालिकेवरील विश्वास वाढला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले,कोपर्डीची घटना अत्यंत निंदनीय होती. संपूर्ण महाराष्ट्रात त्याची प्रतिक्रिया उमटली होती. तपास यंत्रणेकडून या प्रकरणाचा तत्काळ तपास करण्यात आला. त्यासोबतच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची सरकारने नियुक्ती केली. न्यायालयातही हा खटला अत्यंत कमी वेळात पूर्ण करण्यात आला. आरोपींच्या वकिलांनी अनेकवेळा विलंब करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न सरकारी वकिलांनी
हाणून पाडले. विलंब करण्याच्या प्रयत्नाबाबत आरोपीच्या वकिलांना न्यायालयाने दोन वेळा दंडही ठोठावला.आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी राज्यातील माता-भगिनींची भावना होती.न्यायालयाने लवकर आणि चांगला निकाल दिल्यामुळे या महिलांना दिलासा मिळाला आहे. या जलद प्रक्रियेमुळे न्यायालयावरचा विश्वास वाढला आहे. या शिक्षेमुळे अशा प्रकारच्या अपप्रवृत्तींना जरब बसून महिलांवरील अत्याचारास पायबंद बसेल, अशी आशा व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणा आणि सरकारी वकिलांचे अभिनंदन केले.