विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास, दुष्काळात सवलत १५ नोव्हेंबरपासून लागू

0
7

गोंदिया,दि.09ः- राज्य शासनाने दुष्काळी स्थिती जाहीर केल्याने बाधीत परिसरातील नागरिकांना विविध सवलती लागू झाल्या आहेत. त्यातच राज्य परिवहन महामंडळ सामाजिक बांधिलकी जपत १५ नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांना शंभर टक्के मोफत एसटी प्रवासाची सवलत देणार आहे. मात्र, सध्या मासिक पास असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच ही सवलत मिळणार आहे.
राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. अशा तालुक्यांमध्ये विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. अशा तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. तर शिक्षणासाठी ‘अप-डाउन’ करणार्या विद्यार्थ्यांना १०० टक्के मोफत एसटी प्रवास करता येणार आहे. याबात एसटीच्या सर्व विभाग नियंत्रकांना सोमवारी महाव्यवस्थापकांनी लेखी निर्देश दिले आहेत.
सध्या महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना मासिक पासात ६६.६७ टक्के रकमेची सूट दिली जाते. तर ३३.३३ टक्के तिकिट दर वसूल केला जातो. परंतु, आता ही ३३.३३ टक्के रक्कमही आकारण्यात येऊ नये, असे निर्देश विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहे. ही सवलत २०१८-१९ च्या उर्वरित शैक्षणिक सत्राकरिता म्हणजे १५ नोव्हेंबरपासून तर १५ एप्रिल २०१९ या सहा महिन्यांपर्यंत लागू राहणार आहे.