महाराष्ट्राला आर्थिक क्षेत्रात सर्वोकृष्ट कामगिरीसाठी ‘स्टेट ऑफ स्टेट्स’ पुरस्कार

0
15

नवी दिल्ली दि. 23 : महाराष्ट्राने आर्थिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘इंडिया टुडे’ समुहाच्यावतीने ‘स्टेट ऑफ स्टेट्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार उपराष्ट्रपती एम. वैकया नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राज्याचे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा पुरस्कार ‍स्विकारला.
येथील ताजमहल या हॉटेल मध्ये ‘इंडिया टुडे’ या प्रकाशन संस्थेच्यावतीने 15व्या ‘स्टेट ऑफ स्टेट्स परिषद’ चे आयोजन करण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपती , इंडिया टुडे समुहाचे समुह संपादक संचालक (प्रकाशन विभाग) राज चेंगप्पा, इंडिया टुडे समुहाच्या उपाध्यक्ष कल्ली पुरी यावेळी उपस्थित होत्या. याप्रसंगी राज्यांमध्ये होत असलेल्या विविध क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट विकासकामांसाठी विविध पुरस्काराने राज्यांना गौरविण्यात आले. आर्थिक क्षेत्रातील सर्वोकृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्याच्या अर्थव्यवस्थेचे वाटचाल योग्य दिशेने : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये श्री मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्राला आर्थिक क्षेत्रात सर्वोकृष्ट कामगिरीसाठी मिळालेला पुरस्कार मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामुळे आणि जनतेच्या सहकार्याने राज्याची आर्थिक स्थिती उत्तम करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे तो योग्य दिशेने असून या संकल्पावर आज इंडिया टुडेने महाराष्ट्राचा केलेला गौरव यातून शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून येते.
महाराष्ट्रातील व्यापारी बांधव, उद्योग क्षेत्रातील सर्व बंधु-भगिनींना तसेच विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी केलेले परिश्रम, योग्य नियोजनाचे फलित असल्याचेही श्री मुनगंटीवार म्हणाले. महाराष्ट्र शासन लक्ष्यपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे याचे फलश्रुती आज प्राप्त झालेल्या पुरस्कारातून मिळाले असल्याचा पुनरोच्चार श्री मुनगंटीवार यांनी यावेळी केला.
इंडिया टुडेने असे केले मुल्यमापन
इंडिया टुडे समुहातर्फे ‘स्टेट ऑफ दी स्टेटस् कॉन्क्ले व्ह’ हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. नागरिकांना कामाच्या तसेच इतर ठिकाणी संधी देणा-या राज्यांचा शोध घेण्यासाठी या उपक्रमा दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले. गेल्या 5 वर्षातील मुल्यमापनाच्या आधारे विविध क्षेत्रातील राज्यांच्या कामगिरीनुसार राज्यांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. यात व्यापारासाठी पोषक वातावरण व जीवनमानाची गुणवत्ता या दोन महत्वाच्या घटकांच्या आधारे मुल्यमापन करण्यात आले. प्रामुख्यान आर्थिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, आरोग्य, पायाभूत सुविधा, सर्वांगीण विकास, कायदा व सुव्यवस्था, उद्यमशिलता, सुशासन, पर्यावरण, स्वच्छता या क्षेत्रात विविध राज्यांनी केलेल्या कामगिरीचे मुल्यमापन यामध्ये करण्यात आलेले आहे.
यात महाराष्ट्राची देशातील मोठया राज्यांमध्ये आर्थिक क्षेत्रात सर्वोकृष्ट कामगिरी करणारे राज्य म्हणून निवड झाली आहे. 2016 मध्ये सुध्दा आर्थिक क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्राला इंडिया टुडे समुहातर्फे सन्मानित करण्यात आले होते.