जलसंवर्धन हे जनआंदोलन होण्यास ‘मन की बात’ मुळे गती मिळेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

0
11

नागपूर दि.01 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी रामगिरी येथे ऐकला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर मन की बातचा आज पहिलाच कार्यक्रम होता. या संबोधनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जलसंरक्षणाकडे सर्व जनतेचे लक्ष वेधले असून जल संरक्षण हे जनआंदोलन झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

   मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेसोबत संवाद साधला असून जलसंधारण, जलयुक्त शिवार आदी पावसाच्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे संरक्षण करण्यासारख्या उपक्रमाबद्दल देशातील सर्व ग्रामपंचायत सरपंचांना पत्र लिहून जलसंधारणाचे महत्व तसेच पाणी साठविण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात सरपंच व जनतेनेही श्रमदान करुन पाण्याचा संचय केल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.

 महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून कामे पूर्ण झाल्यामुळे शेतीला शाश्वत सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याला मदत झाली आहे. मागील पाच वर्षापासून सातत्याने व परिणामकारक या उपक्रमाची अमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाण्यासंदर्भातील सर्व विभाग एकत्र करुन स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय सुरु केले आहे. प्रधानमंत्री जनतेला या संदर्भात केलेले आवाहन राज्यातील जनता निश्चितच पूर्ण करेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.