26.3 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home महाराष्ट्र बाबासाहेबांचे मुंबईमधील घर राष्ट्रीय स्मारक करणार – मुख्यमंत्री

बाबासाहेबांचे मुंबईमधील घर राष्ट्रीय स्मारक करणार – मुख्यमंत्री

0
38

मुंबई,दि.06 – महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे काम प्रचंड आहे. हे काम ज्या ठिकाणाहून झाले ते बाबासाहेबांचे मुंबईमधील घर राष्ट्रीय स्मारक करू, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केल्यानंतर ठाकरे बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यापाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ,महापौर किशोरी पेडणेकर, मंत्री जयंत पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात,आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार आदित्य ठाकरे यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी मुंबई पोलिसांकडून शासकीय सलामी देण्यात आली.यावेळी बोलताना बाबासाहेबांचे काम एका अग्निकुंडा प्रमाणे आहे. बाबासाहेबांनी तळागाळातील लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडन येथील घर राष्ट्रीय स्मारक बनवण्यात आले आहे. त्याच प्रमाणे बाबासाहेबांचे काम ज्या मुंबईमधील घरातून झाले, बाबासाहेब ज्या घरात 22 वर्ष राहिले ते परळ डबक चाळीतील घर राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आपण या घराला भेट द्यायला जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी देखील आज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन केले. अडीच हजार वर्षांनंतरही ज्या प्रमाणे भगवान बुद्धाचे नाव अजरामर झाले त्याच प्रमाणे डॉ. बाबासाहेबांचे नाव पुढच्या अडीच हजार वर्षांनंतरही घेतले जाईल. बाबासाहेबांमुळे आज देश एक आहे. गरीब आणि तळागाळातील लोकांना त्यांनी हक्क मिळवून दिला आहे. बाबासाहेबांच्या आदर्शावर चालून गरीब आणि तळागाळातील लोकांचा विकास होऊ शकतो, असे मत राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केले.