मुंबई, दि. १7 : जनसामान्याशी निगडीत असलेल्या महसूल विभागाअंतर्गत येणारे कोणतेही काम अत्यंत सुलभतेने व्हावे यासाठी यंत्रणेत आवश्यक ते बदल करण्यात यावेत अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या. महसूल विभागाच्या कामांचा आज त्यांनी सविस्तर आढावा घेतला, त्यावेळी श्री.बोलत होते. या बैठकीला महसूल राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार उपस्थित होते.महसूल विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणून जनजीवन सुसह्य व्हावे यासाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर वाढविण्यावर अधिक भर देण्यात यावा असे सांगून श्री.थोरात म्हणाले, यापुर्वी महसूलमंत्री असतांना सातबारा ऑनलाइन करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. ती प्रक्रिया आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. बदलत्या आवश्यकतेनुसार कामकाजाच्या पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आहे. भूमीहक्क अधिनियमात काही सुधारणा प्रस्तावित आहे. यावरही येत्या मार्चपर्यंत निर्णय घेऊन यातही अधिक सुसुत्रता आणण्यात यावी. अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
ग्रामीण भागात ऑनलाईन प्रणालीचा वापर करणे सोपे जावे यासाठी सेतू केंद्रावरून मार्गदर्शन व्हावे,तसेच भारत नेटच्या समन्वयातून गतिमान कार्य व्हावे, असे राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले. महसूल वाढीच्या उपाययोजना आखत असतांना सामान्य माणसाच्या कल्याणासाठीच्या निर्णयावर अधिक भर असावा असेही ते म्हणाले.यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुद्रांक महानिरिक्षक अनिल कवडे, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, सहसचिव श्यामसुंदर पाटील, डॉ.संतोष भोगले, रमेश चव्हाण यांनी विभागाचा आढावा घेणारे सादरीकरण केले.
| सादरीकरणातील महत्वाचे मुद्दे
• गावठाणांची हद्द निश्चिती करण्यासाठी ड्रोनद्वारे मोजणी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. • भूमि अभिलेख विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणणार. • वेगवेगळ्या परवानग्यांचे सुसुत्रिकरण करणार. • लोकाभिमुख, पारदर्शक व वेगवान सेवा देण्यासाठी शिपाई ते अधिकारी यांना प्रशिक्षण देणार. |





