धाराशिव,दि.३ जुलै – बदलते हवामान,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड… अशा अनिश्चित परिस्थितीतही सोयाबीनचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रुंद सरी-वरंबा (BBF) तंत्रज्ञान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा संदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आज प्रत्यक्ष शेतात उतरून दिला.धाराशिव तालुक्यातील रुईभर येथील प्रगतिशील शेतकरी किरण तीर्थकर यांच्या शेतात श्री.पुजार यांनी स्वतः बीबीएफ पेरणी यंत्र चालवत सोयाबीन पेरणीचे प्रात्यक्षिक केले,तर टोकण पद्धतीने तूर लागवड करून आधुनिक आणि शास्त्रशुद्ध शेतीची दिशा शेतकऱ्यांसमोर उभी केली.
खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रात्यक्षिकाला परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत,”जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध असल्याने वेळेत पेरणी पूर्ण करा,मात्र पारंपरिक सपाट पद्धतीऐवजी बीबीएफ पद्धतीचाच अवलंब करा,असे आवाहन केले.
श्री.पुजार यावेळी म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यात बहुतांश भागात पेरणीसाठी आवश्यक ओलावा निर्माण झाला आहे.मात्र हवामानातील वाढती अनिश्चितता, एल निनोचा संभाव्य परिणाम, अल्पावधीत होणारा मुसळधार पाऊस आणि पावसातील खंड या परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरणीची पद्धत बदलणे ही काळाची गरज आहे.बीबीएफ तंत्रज्ञानामुळे अतिवृष्टी झाल्यास अतिरिक्त पाण्याचा तात्काळ निचरा होतो,तर पावसाचा खंड पडल्यास सरींमध्ये ओलावा अधिक काळ टिकून राहतो. त्यामुळे मुळांना पुरेसा प्राणवायू मिळतो,मुळांची वाढ चांगली होते, अन्नद्रव्यांचे शोषण प्रभावी होते, मुळकूज व पिवळेपणाचा धोका कमी होतो आणि पीक अधिक जोमाने वाढते.हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जलव्यवस्थापन, ओलावा संवर्धन आणि उत्पादनवाढीसाठी बीबीएफ पद्धत अत्यंत प्रभावी आणि शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी टोकण पद्धतीने तूर पेरणीचेही प्रात्यक्षिक केले.योग्य अंतरावर आणि योग्य खोलीवर बियाणे पडत असल्याने अपेक्षित रोपसंख्या मिळते, बियाण्यांची बचत होते, आंतरमशागत सुलभ होते तसेच उपलब्ध पाणी,अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाशाचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनवाढीस मदत होते,असे त्यांनी सांगितले.
See less





