टाटांच्या ‘विस्तार’चे उड्डाण

0
10

नवी दिल्ली – टाटा समूहाचा सर्वाधिक हिस्सा असलेल्या ‘विस्तार’ या नव्या एअरलाईनच्या विमानाने शुक्रवारी पहिल्यांदाच आकाशात झेप घेतली. याबरोबरच तब्बल सहा दशकांनंतर भारतीय हवाई क्षेत्रात टाटा समूहाचे पुनरागमनही साजरे झाले. कोणताही गाजावाजा न करता ही कंपनी चांगली कामगिरी करेल अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे हवाई क्षेत्रात अस्थिर वातावरण असताना या विमान कंपनीने सुरुवात केली असून फुल सव्‍‌र्हिस कॅरिअर म्हणून उधळपट्टी नव्हे, असेही या नव्या विमान कंपनीने स्पष्ट केले आहे.
नव्या कंपनीमध्ये टाटांची ५१ टक्के गुंतवणूक आहे. तर सहभागीदार असलेल्या सिंगापूर एअरलाईन्सने ४९ टक्क्यांची गुंतवणूक केली आहे. संयुक्त उद्यम असलेल्या विस्तारने दिल्ली ते मुंबई असे पहिले उड्डाण केले. यापूर्वी टाटा यांच्याकडे एअर इंडियाची मालकी होती. त्यांनी १९५० मध्ये ही कंपनी सरकारला समर्पित केली. विस्तारच्या पहिल्या फेरीचे टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. दिल्लीतून पहिले उड्डाण घेणा-या या विमानाला मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, अखेर समूहाच्या स्वप्नाची पूर्तता झाली. दिल्ली विमानतळावरून दु. १२.५१ वाजता विमानाने उड्डाण केले आणि २.४६ वाजता मुंबईत हे विमान उतरले. मोठा गाजावाजा करून नंतर पदरी निराशा पाडून घेण्यापेक्षा योग्य तेच करण्यावर भर राहील, असे विस्ताराचे अध्यक्ष प्रसाद मेनन यांनी सांगितले.