नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था पारदर्शी होईल – राष्ट्रपती

0
10

नवी दिल्ली, दि. 25 – काळा पैसा रोखण्यासाठी करण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून येतील. नोटाबंदीच्या दीर्घकालीन परिणामांचा विचार केल्यास या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था पारदर्शी होईल, तसेच डिजिटल व्यवहारांमुळे भ्रष्टाचाराला लगाम लागेल, असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात व्यक्त केला.
राष्ट्रपती म्हणाले की, नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग काही काळासाठी मंदावेल, पण दीर्घकालीन परिणाम विचारात घेतल्यास या निर्णयामुळे अर्थव्यवस्था पारदर्शी होईल, डिजिटल आणि कॅशलेस व्यवहारांमुळे भ्रष्टाचाराला लगाम लागेल, डिजिटल व्यवस्थेमुळे व्यवहार करणे सुलभ होईल,”
यावेळी भारतीय अर्थव्यवस्था करत असलेल्या प्रगतीचाही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात उल्लेख केला, “आव्हानात्मक जागतिक परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था प्रगती करत आहे . इतर देशांच्या तुलनेत भारत हा जगातील सर्वात वेगाने विकसित होत असलेला देश आहे,” असे ते म्हणाले. सततच्या विकासाबरोबर पर्यावरणाचे संरक्षणही आवश्यक असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारतील लोकशाहीतील दोषांवरही राष्ट्रपतींनी बोट ठेवले. भारतीय समाजामध्ये असहिष्णु समाजाचे नव्हे तर सहिष्णू तर्कवादी समाजाचे समर्थन करण्यात आले आहे, असेही राष्ट्रपतींनी सांगितले. 2014 साली झालेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर झालेले मतदान हे लोकशाही मजबूत होत असल्याचे द्योतक आहे. मात्र आता निवडणूक सुधारणा करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांची चर्चा करून पुढाकार घेतला पाहिजे असेही मत राष्ट्रपतींनी मांडले. त्याबरोबरच पर्यावरण संरक्षण, गरिबी, रोजगारवाढ आणि भ्रष्टाचार याबाबतही राष्ट्रपतींनी आपले मत मांडले.