25.2 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home राष्ट्रीय देश भाजपच्या हातातून झारखंडही गेले,झामुमोचे हेमंत सोरेन होणार नवे मुख्यमंत्री

भाजपच्या हातातून झारखंडही गेले,झामुमोचे हेमंत सोरेन होणार नवे मुख्यमंत्री

0
20

रांची(वृत्तसंस्था)दि.24 : झारखंडमध्येही भाजपला सत्ता सोडावी लागली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणूक निकालांत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजदच्या महाआघाडीने ४६ जागांवर निर्णायक आघाडी मिळवली होती. मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. झारखंडच्या एकूण ८१ सदस्यीय विधानसभेत ४१ हा बहुमताचा आकडा आहे. झामुमो नेते हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री होतील असे मानले जात आहे.

भाजपला ११ जागांच्या नुकसानीसह २६ जागांवरच विजय मिळवता आला. स्वत: मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही जमशेदपूर पूर्व या मतदारसंघांतून विजय मिळवता आला नाही. भाजपतून बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या सरयू राय यांनी त्यांचा पराभव केला. रघुवर १९९५ नंरच्या २४ वर्षांत सलग पाच वेळा येथून विजयी झाले होते. मुख्यमंत्र्यांशिवाय त्यांचे चार मंत्री आणि विधानसभेचे सभापतीही पराभूत झाले.

मागील एका वर्षात पाच राज्यांतून भाजप सत्तेतून बाहेर झाला आहे. डिसेंबर २०१८ मध्ये पक्षाला मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये पराभव पाहावा लागला होता. लोकसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतरही मागील सात महिन्यांत महाराष्ट्र आणि झारखंड येथून पक्षाला सत्तेबाहेर राहावे लागत आहे. दुसरीकडे, सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी आल्यानंतर पक्ष आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रानंतर आता झारखंडमध्ये सत्तेत येत आहे.

झारखंड विधानसभा निवडणुकीत झामुमो-काँग्रेस आघाडीला बहुमत मिळत आहे. निकाल समोर येताच आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हेमंत सोरेन यांनी वडील शिबू सोरेन यांची भेट घेत आशिर्वाद घेतला. यानंतर हेमंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, झारखंडच्या जनतेसाठी आज उत्साहाचा दिवस आहे. आजचा दिवस माझ्यासाठी संकल्प करण्याचा दिवस आहे. राज्यातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याबाबत संकल्प करण्याचा दिवस आहे. आजचा हा जनादेश शिबू सोरेन यांच्या परिश्रम आणि समर्पणाचा परिणाम आहे.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेमंत सोरेन यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपला राज्याची अनेक वर्षे सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी झारखंडच्या जनतेचे आभार मानले.

हेमंत बेरहट आणि दुमका दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे विद्यमान मुख्यमंत्री रघुवर दास स्वतःचे माजी सहयोगी सरयू राय यांच्याकडून 10,000 हून अधिक मतांनी पराभूत झाले. रघुवीर यांच्या व्यतिरिक्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिलुआ यांना सुद्धा चक्रधरपूर येथून पराभव स्वीकारावा लागला. मात्र झामुमोच्या सीता मुर्मू जामा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.

12 महिन्यांत एनडीए 5 राज्यांच्या सत्तेतून बाहेर…

12 महिन्यांत मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आता झारखंड येथील सत्ता भाजपने गमावली आहे. मात्र, मिझोराम आणि सिक्कीम भाजपच्या खात्यात आले.

भाजपच्या पराभवाची पाच प्रमुख कारणे…

  • निवडणूक जाहीर झाल्यानंतर आजसूचे सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडणे
  • रघुवर यांच्या जमशेदपूर पूर्व मतदारसंघातील ८६ वस्त्या कायदेशीर न करणे
  • जल-जंगल-जमीनबाबत आदिवासींतील नाराजी
  • केंद्राच्या योजनांवरच भाजपचा भर; पक्षाने शिक्षक, अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यांवर चर्चा केली नाही.
  • भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना तिकिटे दिली.

झामुमोच्या विजयाचे प्रमुख कारण…

  • झारखंडमध्ये १९ वर्षांत ६ मुख्यमंत्री झाले. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पराभूत झाले आहेत. यंदाही भाजपचे बंडखोर सरयू राय यांनी मुख्यमंत्री रघुवर यांना पराभूत केले. २०१४ च्या निवडणुकीत हेमंत सोरेनही दुमका मतदारसंघात पराभूत झाले होते. मात्र बरहेट येथून विजयी झाले होते.
  • झामुमो, काँग्रेस आणि राजद या विरोधकांची महाआघाडी एकजूट राहिली. वेळेत जागावाटप झाले.
  • सोरेन यांच्यावर रघुवर यांनी खालच्या पातळीवर केलेल्या टीकेमुळे भावनात्मक फायदा.
  • एनआरसीमुळे अल्पसंख्याक महाआघाडीच्या पाठीशी राहिले.

२०२० मध्ये दिल्ली, बिहारचे भाजपसमोर आव्हान

वर्षभरात पाच राज्यांतील सत्ता गमावल्यानंतर भाजपसाठी २०२० ही आव्हानात्मक राहणार आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभी दिल्ली आणि ‌अखेरीस बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत. दिल्लीत भाजपचे फक्त तीन आमदार आहेत. तर बिहारमध्ये मागच्या वेळी पक्षाने तोडफोड करत सत्ता राखली होती. एप्रिल-मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा फायदा आतापर्यंत झालेल्या राज्यांच्या निवडणुकांत मिळताना दिसलेला नाही.