नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.27. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन संपुष्टात येण्याच्या अवघ्या 6 दिवसांपूर्वी सोमवारी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यामध्ये कोरोना व्हायरसची देशातील सद्यस्थिती आणि लॉकडाउनवर चर्चा करण्यात आली. चर्चेला पंतप्रधानांसमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा उपस्थित आहेत. कोरोना व्हायरसवर पीएम मोदींनी मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधण्याची ही चौथी वेळ आहे. या चर्चेत केरळच्या मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली. त्यांनी आपल्या जागी राज्याच्या सचिवांना पाठवले. तसेच वेळ कमी असल्याने 9 मुख्यमंत्र्यांशीच बोलता आले.लॉकडाउनचा दुसरा भाग 3 मे रोजी संपणार आहे. तत्पूर्वी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 20 आणि 25 एप्रिल रोजी दोन वेळा लॉकडाउनमध्ये सूट दिली. यामध्ये काही अटी सुद्धा देण्यात आल्या असून त्या-त्या राज्यांवर याच्या अंमलबजावणी संदर्भातील निर्णय सोपविला.३ मे रोजी लॉकडाउनची मुदत संपत आहे. त्यानंतर करावयाच्या उपाययोजनासंदर्भात मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन केलं. राज्यांमधील ज्या जिल्ह्यांमध्ये हॉटस्पॉट आहेत. त्या जिल्ह्यांमधील लॉकडाउन ३ मे नंतरही कायम ठेवण्याची सूचना मोदी यांनी केली आहे. त्याचबरोबर ज्या जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण नाहीत वा जे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. अशा जिल्ह्यांमधील लॉकडाउन उठवण्यासंदर्भात मोदी यांनी सूचना केल्या आहेत.
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत कोरोना विषयावर ही चवथी व्हिडीओ कॉन्फरन्स होती. प्रत्येक कॉन्फरन्समध्ये काही राज्यांना बोलण्याची संधी मिळाली. जी राज्ये राहिली होती त्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाविषयक त्यांच्या राज्यात काय काय उपाययोजना सुरु आहेत ते सांगण्याची संधी आज मिळाली. महाराष्ट्राने यापूर्वीच्या तीन कॉन्फरन्समध्ये आपल्या उपाययोजनांची माहिती दिली होती.
१. कोरोना साथीला सुरुवात झाली आणि चीन वगळता इतर जे २० देश यामध्ये भारताबरोबर होते ,आज ७ ते ८ आठवड्यानी भारताच्या तुलनेत या देशांमध्ये १०० पट जास्त लोकसंख्या संक्रमित झाली आहे.आणी कितीतरी मोठ्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले आहेत.
२. योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय आपण घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली, जनतेने देखील साथ दिली त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याकडे काय झाला ते आपण पाहतोय.
३. पण भारतावरचे संकट टळलेले नाही. पहिला २१ दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे आहे.
५. आपल्या देशात अनेक लॉक, विद्यार्थी, यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत, त्यांना आणावयाचे आहे. विदेशातून अनेक भारतीयांना आणायचे आहे, त्यांना लगेच चाचण्या करून क्वारांटाईण करायचे आहे.
६. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे.
७. कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणे ठरवा. “ दो गज दूरी” हा आपला जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हे देखील आपल्या जीवनात खूळ काळासाठी राहणार आहेत हे लक्षात घ्या.
८. लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण बनवा
९. एका बाजूला आपल्याला कोरोनाचा मुकाबला करायचा आहे तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार गतीने सुरु करायचे आहे.
१०. ३ मे रोजी दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोन मध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
११. संक्रमण क्षेत्रांची संख्या वाढणार नाही याचा आटोकाट प्रयत्न करावा लागेल.त्यासाठी जे जे काही करणे आवश्यक आहे ते करा.
१२. पुढे चालून रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे लागेल. कुठली वाहतूक सुरु राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे का नाही, दुकाने कशी सुरु राहतील इत्यादी
१३. मोठ्या शहरांत रेड झोन्स आहेत पण उर्वरित ठिकाणी ते फैलावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व रेड झोन्सचे व्यवस्थित विश्लेषण आणि मुल्यांकन करा.संक्रमित व्यक्तींचे जास्तात जास्त संपर्क तपासा.
१४. सध्याच्या उद्रेकात ग्रीन झोन्स म्हणजे तर तीर्थस्थळेच म्हटली पाहिजेत
१५. येणाऱ्या दिवसांत ग्रीन झोन मॉडेल्स बनवा. जीवन पद्धती, आपले कामकाज त्यानुरूप बनवण्याची गरज.
असे झोन्स फुल प्रुफ करा
१६. ज्या राज्यांत कोरोनाचा आकडा वाढतोय म्हणजे काही ती राज्ये गुन्हेगार आहेत असे नाही. आकड्यांचा दबाव घेउ नका. भयभीत होऊ नका. अशा राज्यांनी खाली मान घालण्याची गरज नाही. ज्या राज्यांमध्ये आकडे कमी आहेत म्हणजे काही ती महान आहेत असा अर्थ होत नाही. आपण सगळे एकाच संकटातून जात आहोत. काहीही लपवू नका
१७. कोरोनशिवाय जे इतर आजारांचे रोगी आहेत त्यांना योग्य उपचार मिळालेच पाहिजेत. यात ढिलाई नको. आपली परंपरागत वैद्यकीय व्यवस्था सुरु राहिलीच पाहिजे. डॉक्टरांनी दवाखाने सुरु केले पाहिजेतच.
१८. ज्या क्षेत्रांमध्ये कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे तिथे अर्थातच आर्थिक नुकसानही जास्त होणार . २० एप्रिलनंतर आपण काही ठिकाणी शिथिलता आणली पण त्यामुळे आपले आव्हानही वाढले आहे. नक्की कुठले प्रश्न वाढले आहेत ते अभ्यासा.
१९. रेड झोनमधून ऑरेंज आणि ऑरेंजमधून ग्रीन झोन मध्ये कसे जायचे याचा नियोजन आवश्यक आहे.
२०. हीच सुसंधी आहे सुधारणा घडविण्याची. अनेक जुने आणि किचकट नियम आणि प्रक्रिया बदलण्याची संधी सोडू नका. आपदधर्माचे पालन करा. नीती आणि नियम जुने असतील तर आलेली संधी जाईल.
२१. प्रत्येक राज्याने रिफॉर्म्सवर लक्ष द्या. संकटाला संधीत बदला
तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होऊ शकतो. गर्दी आणि गडबड टाळू शकता.





