दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा:उद्धव

0
24

औरंगाबाद – दुष्काळाच्या भीषण संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे वीजबिल आणि पीक कर्ज माफ करण्याची मागणी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) केली.
उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादेत पत्रकारपरिषद घेतली. त्यांनी सांगितले की आम्ही दुष्काळाचे राजकारण करणार नाही. मात्र शेतकऱ्यांना मदत ही मिळालीच पाहिजे. शेतीवर आणि शेतकऱ्यांवर हवामानातील बदल, गारपीट आणि पाणीटंचाई व तिच्यामुळे झालेले नुकसान असे तिहेरी संकट आले आहे. दुष्काळ दूर करणे हाती नाही पण त्याची तीव्रता प्रयत्नपूर्वक दूर करणे आपल्या हाती आहे. वीजबिलांना तात्पुरती स्थगिती न देता वीजबील माफच झाले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की शेतकऱ्यांची परिस्थिती भीषण आहे. राज्यपालांनी दुष्काळी भागाचा दौरा करावा आणि सरकारला दुष्काळ जाहीर करण्याचे निर्देश द्यावेत यासाठी त्यांना भेटून आम्ही विनंती करणार आहोत. मराठवाड्यात जो सातत्याने दुष्काळ पडतो त्यावर तातडीच्या उपाययोजनांसोबतच दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.
जालना – “राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे हवालदिल झाला आहे.असे असताना राज्य सरकार दुष्काळ जाहीर करण्यासाठी पैसेवारी जाहीर होण्याची वाट का पाहत आहे? शिवसेना दुष्काळ जाहीर करण्यास भाग पाडेल,‘‘ असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी श्री.ठाकरे आणि शिवसेनेचे सर्व आमदार जालना जिल्ह्यात मंगळवारी (ता.25) आले होते.वखारी वडगाव (ता.जालना) येथील शेतकरी विजय पवार यांनी कर्ज आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट ठाकरे यांनी घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या कुटुंबास शिवसेनेकडून एक लाख रूपयांची मदत देण्यात आली. या कुटुंबाला घरकुल मिळवून देऊ आणि पाल्याच्या शिक्षणाची जबाबदारी शिवसेना घेईल असे आश्‍वासन ठाकरे यांनी दिले. कडवंची (ता.जालना) येथील डाळींब बागेत जाऊनही त्यांनी पाहणी केली. यावेळी संबंधित शेतकऱ्यास एक लाख रूपयांचा धनदेश मदत म्हणून दिला