अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघाकडून आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी प्रहार पक्षाकडून भव्य रॅली काढण्यात आली. बच्चू कडू स्वत: या रॅलीत सहभागी झाले. यावेळी बच्चू कडू यांनी आक्रमक भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर घणाघात केला. “हम डरते नहीं. डराने वालो को हम डराते है. तानाशाही नहीं चलेगी. उखाड के फेक देंगे. आमची निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. पण निवडणुकीच्या तोंडावर गडी ऐकायला तयार नव्हता. या निवडणुकीत राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. दिनेश बूब हा सच्चा रुग्णसेवक आहे. वर्षभर गोरगरीब लोकांना दिनेश बूब जेवण जेवू घालतात. श्रीमंतांच्या विरोधात ही लढाई आहे. एकाच घरात खासदार, आमदार नवरा-बायको आहेत. आम्ही फक्त मत मारायचे का?”, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
“जेव्हा निकाल हाती येईल तेव्हा देशांतील नेते पाहत राहतील. तुम्ही हळदी-कुंकू घेता. इकडे फिनल मिलचा कामगार आत्महत्या करत आहे. आमचा प्रहार पक्ष स्वतंत्र आहे.आम्ही सर्वसामान्य माणसाचे गुलाम आहोत. काल एक चिठ्ठी आली जास्त बोलाल तर जेलमध्ये जाल. बच्चू कडू कार्यकर्त्यांची अवलाद आहे. दुपट्टा घातला आणि नेता झाला अशी परिस्थिती नाही. जेलमध्ये टाकलं तरी जेलमधून आवाज काढणार. रामदेव बाबाने उद्योग सुरू केले. बचत गटाचे काय? मोदी म्हणायचे अच्छे दिन आएंगे. हे आहेत का अच्छे दिन? 17 रुपयांच्या फाटक्या साड्या वाटल्या. हेच का अच्छे दिन?”, असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला.