38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय भावना गवळींना डावलले; यवतमाळ-वाशिममधून राजश्री पाटील यांना उमेदवारी

भावना गवळींना डावलले; यवतमाळ-वाशिममधून राजश्री पाटील यांना उमेदवारी

0
120

blank

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही तास शिल्लक असताना येथून महायुतीकडून राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेले काही दिवस येथील उमदेवारीबाबत तिढा निर्माण झाला होता. विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी देण्यास भाजपने तीव्र विरोध केल्यानंतर उमेदवार कोण राहणार, या मुद्यावर राजश्री पाटील यांच्या नावाने आता पडदा पडला आहे.

हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाने जाहीर केलेले महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून बाबूराव कदम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. हेमंत पाटील यांच्या उमदेवारीलाही या लोकसभा क्षेत्रातील भाजपच्या तिन्ही आमदारांचा तीव्र विरोध होता. त्यामुळे भाजपने पाटील यांच्याऐवजी अन्य उमेदवार देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना केल्याने बाबूराव कदम यांचे नाव पुढे आले. हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्यासमोर यवतमाळ-वाशिमचा पर्याय देण्यात आला. अखेर हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील (महल्ले) यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करणयात आली.

भावना गवळींच्या निर्णयाकडे लक्ष

महायुतीने भावना गवळींना उमेदवारी दिली नाही तर वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. आता भावना गवळींना डावलण्यात आल्याने त्या काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

blank