दारव्हा, आर्णी येथे काँग्रेसचा संताप मोर्चा

0
13

यवतमाळ,दि.30 : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी दारव्हा येथे राहुल माणिकराव ठाकरे तर आर्णी येथे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात संताप मोर्चा काढला.
हमी भावाने शेतमाल खरेदी, खरेदी केंद्रांची संख्या वाढविणे, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर भाव देणे, जाहीर झालेली कर्जमाफीची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे, कीटकनाशक फवारणीतील मयत शेतकऱ्यांच्या वारसांना तसेच विषबाधित शेतकरी-शेतमजुरांना भरीव आर्थिक मदत शासनाने द्यावी, आदी विविध मागण्यांसाठी काँग्रेसने हा मोर्चा काढला.
दारव्हा येथे उपविभागीय महसूल अधिकारी तर आर्णी येथे तहसीलदारांना काँग्रेस नेत्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. दारव्हा येथे राहुल ठाकरे व अन्य काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. आर्णी येथील मोर्चात अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक मनीष पाटील, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, माजी नगराध्यक्ष आरीज बेग, अनिल आडे, साजीद बेग, अ‍ॅड. प्रदीप वानखडे आदी सहभागी झाले होते.