भाजप २८८ जागा जिंकेल, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

0
8

अमरावती – केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना होणाऱ्या आगामी विधानसभेच्या (२०१९) निवडणुकीत भारतीय जनता पक्ष संपूर्ण २८८ जागा जिंकेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी व्यक्त केला. तसेच सरकारच्या चांगल्या कामांची जनतेपुढे मांडणी करा, असे आवाहन दानवे यांनी कार्यकर्त्यांना केले.
भाजप सदस्यनोंदणीच्या आढावा घेण्यासाठी पश्चिम विदर्भातील निवडक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शनिवारी(दि.१४ ) दुपारी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
सत्तेत येण्यापुर्वी भाजपाने टिंगल टवाळी सहन केली. मात्र दाेन खासदारांवरून भाजपाने २८२ खासदार निवडून आणले. देशात १० कोटी सदस्यनोंदणी करून गिनिज बुकमध्ये भाजपाचे नाव कोरले पाहिजे, असे आवाहन दानवे यांनी यावेळी केले. महाराष्ट्रात पक्षाचे ६५ लक्ष सदस्य झाले असून, आणखी ३५ लक्ष सदस्य नोंदणी करायची आहे. त्यामुळे आमदारांनी जातीने लक्ष देऊन ३५ लक्ष सदस्य नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन दानवे यांनी केले. तीन महिन्यात भाजप सरकारने काय केले हे सांगण्याकरीता प्रत्येक आमदाराने गावागावात जाऊन आपल्या सरकारने केलेल्या कामांची माहिती द्यावी, असे ते म्हणाले. दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर ते प्रथमच अमरावती दौऱ्यावर आले होते.
तीन दिवसांपूर्वी पक्षात अालेल्या नेत्यांनाही पक्षाने अामदार अाणि प्रसंगी मंत्रीही केले अाहे. मात्र, ३०-३० वर्षांपासून पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांनाही अशी संधी मिळाली नाही असे सूचक वक्तव्यही दानवे यांनी केले.