अपेक्षित नसलेला निवडणुकीचा निकाल-खा.पटेल

0
15

भंडारा,दि.28 : सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससह आघाडीच्या सर्व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून जीव ओतून काम केले.शहरासह गावात जे वातावरण होते ते भाजपच्या विरोधात होते. विशेषत: शेतकरी, बेरोजगार युवक,व्यापारी वर्गासह नोकरदार वर्गातही प्रचंड नाराजी होती.या परिस्थितीत निवडणुकीचा निकाल असा येईल असे अजिबात अपेक्षित नव्हते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदा भंडारा शहरात आल्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खा. प्रफुल पटेल बोलत होते.यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार मधुकर कुकडे व लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार नाना पंचबुध्दे,माजी आमदार अनिल बावनकर,नरेश डहारे आदी मान्यवर उपस्थित होते.

खा. पटेल म्हणाले, लोकसभेच्या निकालानंतर नेमके काय बोलायचे याबाबत आम्ही सर्वच निरूत्तर आहोत. गावागावांतील वातावरण व राष्ट्रवादी पक्षासह मित्र पक्षांनी केलेल्या पाहणीदरम्यान जनमताचा कौल हा भाजपविरोधी होता. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे जेवढ्या फरकाने पराभूत झाले तेवढा आम्ही विचार केला नव्हता. विशेषत: तिरोडा व मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रात मतांचे अंतर हे अनाकलनीय अचंबित करणारे ठरले. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर क्षेत्र वगळल्यास सर्वच ठिकाणी मतांचा कौल आमच्या बाजूने राहिल, असे सर्वेक्षणातून वाटत होते. याबाबत मी स्वत:ही पक्ष कार्यकर्त्यांच्या मदतीने सत्यता पडताळून पाहिली होती. परंतु हाती आलेला निकाल आम्हाला निरूत्तर करून गेला.
ईव्हीएमबाबत बोलताना खासदार पटेल म्हणाले, ईव्हीएम मशीनबाबत आमचा आक्षेप नाही. परंतु मागील दोन महिन्यात तब्बल तीनवेळा देशभरातील २२ राजकीय पक्षांनी सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. मात्र आमच्या मागणीकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात आले. भविष्यात निवडणुकीदरम्यान दुसरा पर्याय काय आहे, यावरही विश्लेषण व चर्चा होणे गरजेचे असल्याचे म्हणाले.