मुंबई मनपा निवडणूक येताच सरकार कोसळणार

0
15

मुंबई,दि.8 : ‘अच्छे दिन’ आणण्याचे अमीष दाखवत राज्यात व केंद्रात सत्तेवर आलेल्या मंडळीचे खरे स्वरुप उघड झाले आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांना उद्ध्वस्त करण्याचा भाजपा व सेनेचा डाव आहे. त्यामुळे त्यांना सत्तेवर राहण्याचा काडीमात्र अधिकार नसून राज्यातील सत्तेच्या बदलाची सुरुवात नारायण राणे यांच्या विजयाने करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केले.

वांद्रे (पूर्व) पोटनिवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार राणे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. वांद्रे येथून राज्यातील तर बिहारच्या निवडणुकीतून केंद्रातील सत्ता परिवर्तनाला सुरुवात होईल. युतीतील मतभेदामुळे दोन-अडीच वर्षात राज्यात पुन्हा निवडणुका होतील, असे नवे राजकीय भाकित त्यांनी यावेळी केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही मर्दांची होती; पण त्यांच्या वारसांनी शान घालवली. या वारसांनी आज शिवसेना कुठे नेऊन ठेवली आहे, हे आपण सर्व जण आपण पाहत आहोतच. अशी शिवसेना बघण्याची मराठी माणसांना सवय नव्हती. बाळासाहेबांनी समाजातील सर्व घटकांचा विचार केला होता. मनोहरपंतांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करून त्यांनी राणेंना मुख्यमंत्री केले. हल्लीच्या ठाकरेंच्या पिढीला मात्र राणेंची किंमत कळली नाही, असा जोरदार टोला पवारांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेता लगावला.