भंडारा,दि.13 : केंद्रात व राज्यात भाजपने जनतेला खोटे आश्वासने देवून सत्ता काबिज केली. दिलेल्या वचनांपैकी एकही वचन पूर्ण केले नाही. विशेषत: शेतकऱ्यांच्या जखमांवर अक्षरक्ष: मीठ चोळण्यात आले. राज्यातील १६ हजार शेतकऱ्यांनी मागील पाच वर्षात आत्महत्या केल्या आहेत. यासाठी फक्त भाजप सरकार कारणीभूत असून अशा सरकारला सत्तेतून हद्दपार करा, असे जाहीर आवाहन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त भंडारा व तुमसर येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. भंडारा व तुमसर येथे शिवस्वराज्य यात्रा पोहचल्यानंतर यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.खा. अमोल कोल्हे यांनी भाजप सरकारवर शिवरायांचे किल्ले भाडेतत्वावर देण्याचा खरपूस समाचार घेतला. महागाईने उच्चांक गाठला असून देशात व राज्यात मंदीचे चावट आहे. अशा स्थितीतही भाजप सरकार आमिषे व प्रलोभने देवून भुलथापा देण्याचे कार्य करीत आहे. सभेत बेरोजगारी, जीएसटी, नोटबंदी, महिलांवरील अत्याचार यावरही उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनी शिरसंधान साधले. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून विधानसभेच्या होवू घातलेल्या निवडणुकात नागरिकांनी जागृत होवून मतदान करावे, हाच त्या मागचा हेतू असल्याचेही उपस्थित मान्यवरांनी स्पष्ट केले. तुमसर येथे झालेल्या सभेत मंचकावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार अनिल बावनकर, प्रदेश सचिव अभिषेक कारेमोरे, राजेश देशमुख, राजू कारेमोरे, ठाकचंद मुंगुसमारे, राजकुमार माटे,जि.प.सभापती धनेंद्र तुरकर आदी भंडारा येथे झालेल्या जाहीर सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह खासदार अमोल कोल्हे, सरचिटणीस अमोल मिटकरी, रूपाली चाकणकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचकावर प्रकाश गजभिये, महेबुब शेख, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, धनंजय दलाल, महेंद्र गडकरी, सुमेध श्यामकुंवर, नरेश डहारे, यशवंत सोनकुसरे, लोमेश वैद्य, नरेंद्र झंझाड, परवेज पटेल, चेतक डोंगरे आदी उपस्थित होते.





