गोंदिया,दि.29: निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन चार दिवस झाले तरी अद्याप सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेकडून दबावाचे राजकारण केले जात आहे. सत्तेच्या वाटाघाटीत आपलं सामर्थ्य वाढावे यासाठी दोन्ही पक्ष अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवताना दिसत आहेत. गोंदियाचे(भाजप बंडखोर) अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपाला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांकडे सोपवले आहे.विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.त्यांच्यासोबत या जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ.परिणय फुके,महेश अग्रवाल सुध्दा उपस्थित होते.त्याआदी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. शिवसेना , भाजपाच्या महायुतीला 161 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे महायुती सत्ता स्थापन करू शकते. मात्र सरकारमध्ये समान वाटा मिळावा, असा आग्रह शिवसेनेने धरला आहे. सत्तेचे समान वाटप करा, अन्यथा अन्य पर्याय खुले आहेत, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर दबाव टाकला आहे. तर शिवसेनेचे तब्बल 45 आमदार संपर्कात असल्याचा दावा करत भाजपाने खळबळ उडवून दिली आहे.सत्ता स्थापन करण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. सध्या भाजपाचे 105 आमदार आहेत. तर शिवसेनेचे 56 उमेदवार निवडून आले आहेत. प्रहारच्या बच्चू कडूंनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आमदार रवी राणांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे.





