गडचिरोली,दि.19ः- गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात ओबीसी समाज राहतो. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते. मात्र, समाज कल्याणच्या वस्तीगृहामध्ये ओबीसीसाठी आरक्षण कमी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. परिणामी ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे लोकसभा क्षेत्रातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती करावी, अशी मागणी खा. अशोक नेते यांनी नियम ३७७ अधीन सुचने अंतर्गत लोकसभेत केली.
यावेळी लोकसभेत निवेदन करतांना खासदार अशोक नेते म्हणाले, गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्र हा महाराष्ट्रतील सर्वात मागास, आदिवासी बहुल, उद्योगविरहित, नक्षल प्रभावीत क्षेत्र आहे. आदिवासी समाजसोबतच येथे अनुसूचित जाती व इतर मागास प्रवर्गातील नागरिकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. येथील गरीब विद्यार्थी तथा ग्रामीण भागात शिक्षणाच्या पुरेशा सोयी-सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना तालुकास्थळी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जावे लागते. परंतु समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात ओबीसीसाठी फक्त २ टक्के जागा आरक्षित असल्याने ओबीसी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. असेही खा. नेते यांनी लोकसभेत सांगितले.
पुढे बोलताना खास नेते म्हणाले, शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, मागास तथा देशातील विशेष करून महाराष्ट्रातील आदिवासी बहुल गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्रातील मागास भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची क्षमता वाढविण्यासाठी शासनाने काही उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे का? तसेच मागास वर्गातील विद्यार्थी- विद्यार्थींनीसाठी स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आकांशीत गडचिरोली जिल्हा तथा इतर मागास क्षेत्रासाठी सादर करण्यात आला आहे काय, असेही खा. नेते यांनी शासनाला विचारले व ओबीसीसाठी स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती करण्याची मागणी लोकसभेत रेटून धरली





