सप्तश्रृंगी गड घाटात एसटी बस थेट दरीत कोसळली;१५ प्रवाशांचे जीव टांगणीला

0
28

१ जण ठार

नाशिक:- नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गड घाटातून खामगावला जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस सप्तश्रृंगी घाटातील दरीत कोसळली. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून १७ ते १८ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आज बुधवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव आगाराची बस सप्तश्रृंगी गडावरून खामगावला जाण्यासाठी निघाली होती. या बसमधून २० प्रवासी प्रवास करीत होते. वणी गड उतरत असताना गणपती पॉईंटजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर बस थेट दरीत कोसळली. या दुर्घटनेत सुमारे १८ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मदतीच्या सूचना दिल्या आहेत.

वणी घाटात एसटी बसला अपघात झाला आहे. त्याची माहिती घेतली असून संबंधीत यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जी माहिती आहे त्यानुसार खामगाव डेपोची बस असून त्यातील १८ प्रवासी जखमी आहेत. गणपती पॉईंटजवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला आहे. अशी प्राथामिक माहिती आहे. अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आई सप्तश्रृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना, अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भूसे यांनी दिली आहे.

सप्तश्रृंगी अपघातातील जखमींना तातडीने मोफत वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना

मुंबई, दि. 12 :- नाशिकच्या वणी सप्तश्रृंगी घाटात झालेल्या एसटी बस अपघातातील जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने आणि मोफत करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.आज सकाळी अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने नाशिक जिल्हाधिकारी आणि कळवणच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन करुन माहिती घेतली, तसेच जखमींना मोफत वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या सूचना दिल्या. पालकमंत्री दादा भूसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनामार्फत मदतकार्य सुरु असल्याचे सांगत, अपघातात मृत्यू पावलेल्या महिला प्रवाशाच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.