
महामोर्चामुळे उपराजधानी झाली जाम,
आरक्षण बचावच्या घोषणा देत व्यक्त केली खदखद,
२ सप्टेंबरचा तो शासन निर्णय रद्द करण्याची एकमुखी मागणी
नागपूर,दि.११ : महायुती सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाज अस्वस्थ झाला आहे. हा शासन निर्णय सरकारने रद्द करावा, या मागणीसाठी शुक्रवारी नागपुरात ओधीसींचा भव्य आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विदर्भासह राज्यभरातून लाखोच्या संख्येत ओबीसी बांधव सहभागी झाले होते. यामुळे नागपूर शहर पूर्णतः जाम झाले होते. नागपुरातील महामोर्चा फक्त झाँकी आहे. ओबीसींकडे दुर्लक्ष केल्यास मुंबईच नव्हे तर पुणे, ठाणे जाम करू, असा इशारा या महामोर्चातून देण्यात आला.
राज्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने शुक्रवारी नागपुरातील यशवंत स्टेडियमवरून महामोर्चा निघाला. या मोर्चात पुर्व विदर्भातील जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाले होते. विदर्भातील विविध जिल्ह्यांतील सकल ओबीसी संघटनांनी या मोर्चासाठी तयारी केली होती. यशवंत स्टेडियम इथून दुपारी दीड वाजेच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. पंचशील चौक, व्हेरायटी चौक इथून मोर्चा हळूहळू संविधान चौकाच्या दिशेने निघाला. मोर्चेकऱ्यांनी जय ओबीसी लिहिलेली पिवळी टोपी, पिवळा झेंडा आणि पिवळ्या रंगाचा दुपट्टा घातला होता. हजारोंच्या संख्येने सहभागी या मोर्चाने नागपुरातील रस्त्यावर जणू ओबीसींचे पितळे वादळ उठले होते. जय ओबीसी जय संविधान, ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे, अशा घोषणा देत मोर्चेकरी चालत होते. मोर्चा संविधान चौकात आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. यावेळी विविध नेत्यांनी आपले विचार व्यक्त करत २ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणी केली.
तेलंगणाप्रमाणे ओबीसींना ४२ टक्के आरक्षण द्या: विजय वडेट्टीवार
सकल ओबीसी मोर्च्याचे सयोंंजक काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले, ओबीसी समाजात आता मराठा समाज घुसत आहे, तो समाज पैलवान आहे, हिंद केसरी असलेला मराठा समाज, दुसरीकडे ओबीसी समाज हा कुपोषित आहे त्यांच्यासमोर ओबीसी कसा टिकणार? म्हणूनच ही ओबीसींच्या अस्तित्वाची लढाई आहे. एकीकडे सरकार म्हणत आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि दुसरीकडे ओबीसीमध्ये घुसखोरी होत आहे. सरकारमध्ये दम असेल तर तेलंगणा सरकारप्रमाणे ४२ टक्के आरक्षण द्या, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली. सरकारचा डीएनए ओबीसींचा असेल तर हा शासन निर्णय रद्द करून तुमचा डीएनए सिद्ध करू, तसेच सरकारच्या या शासन निर्णयामुळे ओबीसींच्या मानेवर सुरी फिरणार आहे. त्यामुळे सरकारने आताच आपली भूमिका सुधारावी, अन्यथा मुंबईच नाही तर ठाणे आणि पुणेही जाम करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, जेव्हा मराठा समाजाला EWS चे आरक्षण मिळाले तेव्हा आम्हीच पाठिंबा दिला. स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिले पाहिजे पण ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे हा अट्टाहास आहे, त्याला आमचा विरोध आहे. ओबीसी समाजातील लोकांना एक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वर्ष लागते इथे मराठा समाजाला एक तासात प्रमाणपत्र दिली जात आहे हा अन्याय नाही का? आम्ही कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही आम्ही लढत राहणार अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडली.
मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे असे असताना या सरकार मधील सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणतो, शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागली आहे, आम्ही निवडणुकीत आश्वासन देत असतो यातून सरकारची खरी नियत दिसत आहे. हे सरकार समाजा- समाजात भांडण लावत आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांना भिकेला लावत आहे यांना शेतकरीच जागा दाखवेल.

राज्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने लाखोंच्या संख्येने यशवंत स्टेडियमवरून महामोर्चा निघाला. संविधान चौकात मोर्चा आल्यानंतर सभेत रुपांतर झाले. यात समाजबांधवांना आवाहन करताना, मराठा आरक्षणासाठी सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानंतर मराठवाड्यात दररोज हजारो प्रमाणपत्रांचे वाटप सुरू आहे. यामुळे राज्यात ओबीसी तरुणांचे आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. फक्त जरांगे यांच्या भरवश्यावर महायुती सरकार आले आहे का? ओबीसी मधील ३७४ जातींनी पण या सरकारला कौल दिला आहे, हे सरकार ते विसरले आहे म्हणून ओबीसींवर अन्याय सुरू आहे.ओबीसी समाजात आता मराठा समाज घुसत आहे,तो समाज पैलवान आहे.एका बाजूला हिंद केसरी असलेला मराठा समाज,दुसरीकडे ओबीसी समाज हा कुपोषित आहे त्यांच्यासमोर ओबीसी कसा टिकणार? म्हणूनच ही ओबीसींच्या अस्तित्वाची लढाई आहे.
मोर्चात हे नेते होते सहभागी
या मोर्चात ओबीसी विचारवंत कायदेतज्ञ वक्ते एड.मंगेश ससाणे,ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे,ओबीसी नेते लक्ष्मण हाके,नवनाथ वाघमारे,सकल ओबीसी महामोर्च्याचे समन्वयक उमेश कोराम,रासपचे नेते महादेव जानकर,गोंदिया सकल ओबीसी मोर्च्याचे बबलु कटरे,अमर वराडे,खेमेंद्र कटरे,मनोज मेंढे,कैलास भेलावे,अशोक लंजे,चंद्रपूरचे अनिल डहाके,सतिश मालेकर,गोविंद भेंडारकर,भंडारा सकल मोर्च्याचे सदानंद इलमे,गोपाल सेलोकर,बाळकृष्ण सार्व,उमेश सिंगनजुडे, ब्रम्हपुरीचे श्याम झाडे,यवतमाळचे विलास काळे,ज्ञानेश्वर गोबरे,अंजली साळवे,सुषमा भड,कृतल आकरे,एड.समिक्षा गहाणे,खासदार प्रशांत पडोळे, खासदार प्रतिभा धानोरकर, खा. श्यामकुमार बर्वे, आमदार अभिजित वंजारी, आ. विकास ठाकरे, आमदार रामदास मसराम, बाळासाहेब मांगरुळकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख, माजी आमदार सुनील केदार, माजी आमदार माणिकराव ठाकरे,रवींद्र दरेकर,कुंदा राऊत,अवंतिका लेकुरवाळे आदी सहभागी झाले होते.





