उरी हल्ल्यात महाराष्ट्रातील तीन जवान शहीद

0
12
मुंबई, दि. १९ – उरीमध्ये रविवारी भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात १७ जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये तीन जवान महाराष्ट्रातील आहेत. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार  लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे , शिपाई जानराव उईके आणि  शिपाई संदीप सोमनाथ ठोक अशी या जवानांची नावे आहेत.
चंद्रकांत शंकर गलांडे साता-याच्या जासी गावचे आहेत तर, जानराव उईके अमरावतीच्य नांदगावचे आणि संदीप सोमनाथ ठोक नाशिकच्या खडांगळीचे आहेत. सिन्नर तालुक्यातील खडांगळी गावच्या संदीप यांची दोन महिन्यापूर्वीच उरी येथे बदली झाली होती. तीनही जवानांचे पार्थिव विशेष विमानाने दुपारी पुणे येथे येईल. तिथून पार्थिव मूळगावी नेण्यात येईल. काश्मीर खोऱ्यात प्रत्यक्ष सीमारेषेपासून जवळच असलेल्या उरी शहरातील भारतीय लष्कराच्या एका तळात घुसून रविवारी आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले. प्राणहानीच्या दृष्टीने अलीकडच्या काळातील लष्करी तळावरील हा सर्वांत भीषण हल्ला होता.  चारही हल्लेखोर पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे होते व त्यांच्याकडे पाकिस्तानी शस्त्रे होती, असे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील खडांगळी गावात संदीपचे कुटुंब शेतात राहते. घरची सामान्य परिस्थिती असलेले संदीपचे वडील टेलरिंगचे काम करून शेती करतात, तर त्याचा मोठा भाऊही शेती करतो. संदीप हे सिन्नरमधील पाचवे हुतात्मा जवान आहेत. संदीप यांचे लग्न दिवाळीनंतर होणार होते. दोन महिन्यांपूर्वी ते आपल्या गावी आले होते. त्यानंतर ते पाच जुलैला पुन्हा कामावर रुजू झाले होते. या वेळी त्यांच्या लग्नाचे बोलणे झाले होते आणि त्यांचा विवाह दिवाळीनंतर करण्याचे ठरले होते. पण, आज त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. सैन्यदलात स्वयंपाकी म्हणून काम करत असलेल्या संदीप यांची सैन्यदलात जाण्याची लहानपणापासून इच्छा होती. 2012 मध्ये ते सैन्यदलात भरती झाले होते. यापूर्वी ते बिहार रेजिमेंटमध्ये होते. त्यानंतर त्याची बदली 22 मराठा बटालियनमध्ये झाली होती. डेहराडूनहून नुकतीच त्यांची उरी येथील लष्करी तळावर बदली झाली होती.