39.2 C
Gondiā
Wednesday, June 10, 2026
Home Top News भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड…!

भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड…!

0
33

लातूर जिल्ह्यातील बोंबळीच्या गायकवाड कुटुंबियांना मिळाला दिलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संवेदनशीलता, प्रशासनाची तत्परता

वीज पडून दगावलेला बैल, आर्थिक सहाय्यासह, शेतकऱ्याला मिळाला बैल

मुंबई, दि. १०: वीज पडून बैल दगावल्याने जोखडाला पत्नीला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या व्य़थेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, अन् या शेतकरी कुटुंबाला अवघ्या काही तासात बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाई पोटीची रक्कम मिळाली. यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे निर्देश आणि जिल्हा प्रशासनासोबतच, अन्य विभागांनी दाखवलेली संवेदनशीलता चर्चेची ठरली आहे. या संवेदनशीलतेमुळे आता काशिनाथ गायकवाड यांना पत्नीला बैलाच्या जागी जूंपावे लागणार नसल्याने, या कष्टकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्दचे काशिनाथ गायकवाड भूमिहीन शेतकरी. त्यांच्याकडे असलेल्या बैलजोडीच्या मदतीने श्री. गायकवाड व त्यांच्या पत्नी सौ. हौसाबाई परिसरातील शेतकऱ्यांची जमीन कसतात. मशागतीची, नांगरणी ते पेरणी, वखरणी अशी मिळेल ती कामे करतात, यावरच त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यातच त्यांच्यावर दुर्दैव ओढवले. त्यांच्याकडील एका बैलाचा शुक्रवारी (५ जून) झालेल्या वादळी पावसात वीज पडून मृत्यू झाला. त्यामुळे मिळालेली कामे पूर्ण करण्यासाठी, श्री. गायकवाड यांना पत्नी सौ. हौसाबाई यांना जुंपावे लागल्याचे वृत्त मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यापर्यंत पोहचले. यावर त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानुसार प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संपर्कात राहून, लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांना महसूलसह, सर्व यंत्रणांना श्री. गायकवाड यांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तहसिल कार्यालयासह, पशूसंवर्धन, कृषी सर्व यंत्रणा श्री. गायकवाड यांच्यापर्यंत पोहचल्या.
पशूसंवर्धन विभागाने प्रयत्नपूर्वक एक बैल उपलब्ध करून घेतला आणि तो जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड, तहसिलदार सोमनाथ वाडकर यांच्यासह पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी आदींच्या उपस्थितीत थेट गायकवाड कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला. यामुळे काशिनाथ गायकवाड यांच्यासर, त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी तातडीने दखल घेत, बैल मिळवून दिल्याने गायकवाड यांच्या पत्नी सौ. हौसाबाई आणि मुलगा पुंडलिक यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह, जिल्हा प्रशासनाचेही आभार मानले. सौ. हौसाबाई म्हणाल्या, आमच्या एका बैलाचा वीज पडून मृत्यू झाल्याने दुर्दैवाने आमच्यावर अशी वेळ आली. पण आमच्या अडचणीची दखल घेऊन, लगेचच मदत मिळाल्याने बरे वाटले. आता पुढे येणाऱ्या खरीप हंगामासाठी मिळालेली कामे पूर्ण करण्याची चिंता दूर झाली. बैल पण चांगला मिळाला आहे. आता त्याची पण चागंली काळजी घेऊ आणि मिळालेली कामे देखील चांगली होतील असे बघू.

नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचा मृत्यू झाल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीने अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. श्री. गायकवाड यांच्या दगावलेल्या बैलाचा तातडीने पंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून नियमानूसार आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. ही रक्कम श्री. गायकवाड यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.