महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मान्सूनने (Monsoon) आता वेग पकडला आहे. मागील 24 तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली असून, मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.भारतीय हवामान विभागाने 22 जूननंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आता राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. येत्या 30 जूनपर्यंत राज्यात पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
17 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा
पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, पुढील काही तासांमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, बीड, परभणी, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, भंडारा, वर्धा, नागपूर आणि यवतमाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 24, 25 आणि 26 जून हे दिवस राज्यात पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
राज्यातील पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना आता वेग येण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, खानदेश आणि मराठवाड्यात विविध टप्प्यांमध्ये पाऊस होईल, असा अंदाज आहे.मुंबई, पुणे, घाटमाथा, नाशिक, रत्नागिरी आणि रायगड परिसरातही जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा पट्टा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी व्यक्त केली आहे.





