भाजपच्या मंत्र्यांनो, आपापले कोथळे सांभाळाच

0
8

मुंबई दि.20:– अवघ्या काही तासांवर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेची धार शिवसेनेकडून आणखीनच तीव्र केली आहे. मुंबईतील शेवटच्या प्रचारसभेत फडणवीस यांनी पालिकेतील भ्रष्टाचाऱ्यांचे कोथळे बाहेर काढू, अशी गर्जना केली होती. पण असे झाले तर मुख्यमंत्र्यांचा सुरा सहकाऱ्यांच्याच रक्ताने माखेल, असा खणखणीत टोला ‘सामना’तील अग्रलेखातून लगाविण्यात आला आहे.दरम्यान काल मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यातील दहा महानगरपालिका, दहा जिल्हा परिषदा व ११८ पंचायत समित्यांसाठीच्या प्रचार संपला. प्रचाराच्या संपूर्ण काळात शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांकडून एकमेकांवर तुफान टीका होताना दिसली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील परस्परांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मतदार उद्या कोणाच्या पारड्यात कौल टाकणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.या अग्रलेखातून भाजपच्या मंत्र्यांनो, आपापले कोथळे सांभाळाच. कारण मुख्यमंत्री थेट भ्रष्टाचाऱ्यांचे कोथळे बाहेर काढणार आहेत. मुख्यमंत्री बेफाम झाले आहेत. उद्याच्या पराभवानंतर ते पुरते वेडेपिसे होतील. कारण ढोंग व खोटेपणाचा कोथळा मुंबईसह महाराष्ट्राची जनता काढणार याविषयी आमच्या मनात शंका नाही. तुम्ही कितीही आपटा; विजय शिवसेनेचाच होणार आहे. मुंबई शिवसेनेच्या विजयासाठी सज्ज आहे, असा ठाम विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.