नागपूर कराराचा सन्मान करा किंवा अधिवेशनाचा वार्षिक फार्स बंद करा-आ.देशमुख

0
16

नागपूर(विशेष प्रतिनिधी),दि.15 – विदर्भाला न्याय मिळावा, या भागाचे प्रश्‍न सुटावेत, यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात सुरू करण्यात आले. परंतु, दहा-बारा दिवसांच्या कामकाजातून विदर्भाला न्याय मिळू शकत नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चालू अधिवेशन किमान ६ आठवडे घेऊन नागपूर कराराचा सन्मान करावा किंवा या नागपूर अधिवेशनाचा वार्षिक फार्स बंद करून टाकावा, अशी मागणी भाजपचे काटोलचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी केली आहे.

विदर्भ महाराष्ट्रात विलीन होण्यापूर्वी नागपूर ही मध्यप्रांत व वऱ्हाडाची राजधानी होती. राजधानी मुंबई होणार असल्यामुळे इकडचे प्रश्‍न सोडविण्यात अडचणी येतील हे ओळखून तत्कालीन नेत्यांनी नागपूर करार केला. त्यानुसार हे अधिवेशन सुरू झाले आहे. सरकारचा संपूर्ण कारभार नागपुरात यावा, अधिवेशनाच्या आधी आणि नंतरही किमान एक-दोन आठवडे सरकारने येथे राहावे, अशी अपेक्षा होती.

प्रत्यक्षात गेली कित्येक वर्षे दहा-पंधरा दिवसांचे कामकाज होते आणि सरकार मुंबईला परत जाते. त्यामुळे विदर्भाचे प्रश्‍न सुटत नाहीत. नागपूर कराराचा सन्मान म्हणून, विदर्भाच्या विकासासाठी भाजपची असलेली प्रतिबद्धता सिद्ध करण्यासाठी आणि या प्रदेशाच्या प्रश्‍नांना न्याय देण्यासाठी हे अधिवेशन किमान ६ आठवडे चालावे, अशी अपेक्षा आहे. ते होणार नसेल तर हा वार्षिक उपचार किंवा तमाशा बंद केलेला बरा, असे मत डॉ. देशमुख यांनी एका निवेदनात व्यक्त केले आहे.