फवारणी बळींच्या वारसांना 4 लाख द्या; हायकोर्टाचे आदेश

0
10

नागपूर,दि.23- कीटकनाशक फवारणी मृत्यू प्रकरणांमध्ये मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देय नुकसान भरपाईत आणखी दोन लाखांची भर घालून पीडित कुटुंबीयांना एकूण चार लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य शासनाला दिले. तसेच कर्तव्यात कसूर केलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची तीन महिन्यांत विभागीय चौकशी पूर्ण करावी, गंभीर कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, असे निर्देशही न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने दिले. याशिवाय अशा मृत्यू प्रकरणांत नुकसान भरपाईची किमान रक्कम नेमकी किती असावी याबाबतचे ठोस धोरण तीन महिन्यांत राज्य शासनाने आणावे, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले. कीटकनाशक फवारणी मृत्यू प्रकरणांवर सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी दाखल केलेली जनहित याचिका कोर्टाने गुरुवारी निकाली काढली.