१ ते १० जून या कालावधित शेतकरी संप

0
11

नाशिक, दि. २१: राष्ट्रीय किसान महासंघातर्फे देशभरातील १३० संघटनांनी एकत्र येऊन १ ते १० जून या कालावधित शेतकरी संप पुकारला आहे. महाराष्ट्रातील नाशिकसह मुंबई, पुणे व नागपूर या शहरात हा संप होणार असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याचे तंत्र वापरून देशभरात संप केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय किसान महासंघाच्या वरिष्ठ कृती व सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश तराळ यांनी दिली आहे. सरकार शेतकऱ्यांचा संप दडपण्यासाठी साम, दाम, दंड, भेद वापरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकाच्या पोलीसी बळाला व दबाव तंत्राला प्रत्युत्तर देण्यासाठी देशव्यापी संपात गनिमी काव्याचे तंत्र वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले
हुतात्मा स्मारकात सोमवारी (दि. २१) राष्ट्रीय किसान महासंघातर्फे नाशिक जिल्ह्यातील संपाचे नियोजन करण्यासाठी बैठक झाली. व्यासपीठावर वरिष्ठ कृती व सल्लागार डॉ. गिरीधर पाटील, लक्ष्मण वंगे आदी उपस्थित होते. एकूण २२ राज्यांत हा शेतकरी संप होत असून, संपादरम्यान, शेतमाल व भाजीपाला विक्री नये अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. गेल्यावर्षी किसान क्रांती जनआंदोलनाच्या नावाखाली पुणतांबा येथून ऐतिहासिक संप झाला होता. या संपानेच संपूर्ण देशातील शेतकरी संपाला दिशा दिली असून, या देशव्यापी शेतकरी संपासाठी नाशिक जिल्ह्यातील कृती समितीही या बैठकीत तयार करण्यात आली. १ जूनपासून पुकरण्यात आलेल्या संपात चार दिवस सलग शहराचा भाजीपाला खंडित केल्यानंतर ५ जून धिक्कार दिवस, ६ जून मंदसौर येथील हुतात्मा शेतकऱ्यांना श्रद्धांजली व सरकारचे श्राद्ध, ८ जून असहकार दिवस, ९ जूनला लाक्षणिक उपोषण व १० जूनला भारत बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या संपाच्या माध्यमातून राष्ट्रीय किसान महासंघाने शेती व शेतीपूरक व्यवसाय यांना सरसकट कोरा अशीच कर्जमाफी, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के हमीभाव, किमान हमीभाव उत्पन्नाचा हमी या देशपातळीवरील मागण्यांसह शेती व शेतीपूरक व्यवसायांना मोफतवीज, सुरक्षित शेती उत्पन्न कायदा (इमा) कायद्याची अंमलबाजवाणी, दुधाला किमान ५० रुपये स्थिर भाव व बैलगाडा शर्यत व तत्सम स्पर्धांना कायदेशीर मान्यता या राज्यपातळीवरील मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत. शंकर दरेकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी केले.