मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकीचे निनावी पत्र

0
7

मुंबई,दि.08(वृत्तसंस्था)ः- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकीचे निनावी पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्‍यात आली आहे. सुरक्षा यंत्रणेने सतर्क राहावे, असेही आदेश गृहमंत्रालयाने दिले आहे.गडचिरोली जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पोलिसांच्या कारवाईत मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. त्यानंतर आलेल्या धमक्यांच्या दोन पत्रांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, त्यांचे कुटुंबीय आणि गडचिरोलीतील कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जाईल आणि आम्ही त्या घटनेचा बदला घेऊ, अशा धमक्या देणारी पत्रे आल्याने खळबळ उडाली.
आम्ही ‘मार्क्स’च्या विचारांनी प्रेरित लोक आहोत. आमच्यातील काही जणांना ठार करुन तुम्ही आमचा विचार संपवू शकणार नाही. गडचिरोलीत जे काही घडले त्याचा हिशेब नक्कीच होईल, अशा आशयाची भाषा त्या पत्रांमध्ये वापरण्यात आली असल्याचेही सूत्रांनी सांगितले. ही पत्रे नेमकी कुठून आली याचा कसून तपास गृह विभागाकडून सध्या केला जात आहे.कोरेगाव-भीमातील घटनेप्रकरणी नक्षलसमर्थक चौघांना बुधवारी अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया वाढण्याची शक्यता लक्षात घेऊनही सतर्कता बाळगली जात आहे.