विभागात गोंदिया जिल्हा ‘टॉप’,निकालात मुलींची आघाडी

0
26

गोंदिया,दि.08 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याचा एकूण निकाल 89.41 टक्के लागला असून कोकण विभाग अव्वल (96 टक्के) तर नागपूर विभागाचा सर्वात कमी (85.97 टक्के) निकाल लागला आहेमागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल २.३० टक्क्यांनी वाढला असला तरी राज्यात यंदाही शेवटचे स्थानच मिळाले आहे. संपूर्ण विभागाच्या निकालाची आकडेवारी ८५.९७ टक्के इतकी आहे.गोंदिया जिल्ह्याने विभागात भरारी घेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.विभागात यंदा गोंदिया जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यातून २२ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १९ हजार ७८९ म्हणजेच ८७.५५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर विभागात उत्तीर्णांची सर्वात कमी टक्केवारी वर्धा जिल्ह्याची आहे. तेथे १७ हजार ८०७ पैकी १४ हजार ८९३ म्हणजे ८३.६४ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. नागपूर जिल्ह्याचा निकाल ८६.२९ टक्के लागला.
विभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ८२ हजार ६८ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ७३ हजार ४५३ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.३१ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ८२.८५ टक्के इतके आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचे निकाल जाहीर करण्यात आले. नागपूर विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष देशपांडे रविकांत देशपांडे यांनी निकालाची घोषणा केली. नागपूर विभागात एकूण १ लाख ७० हजार ३१४ पैकी १ लाख ४६ हजार ४१८ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले.

जिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारी
जिल्हा                     निकाल टक्केवारी
भंडारा                      ८६.६४ %
चंद्रपूर                      ८५.१५ %
नागपूर                     ८६.२९ %
वर्धा                         ८३.६४ %
गडचिरोली               ८५.८९ %
गोंदिया                    ८७.५५ %

LIVE UPDATES:
– राज्याचा एकूण निकाल 89.41 टक्के

– कोकण विभाग अव्वल- 96 टक्के

– नागपूर विभागाचा सर्वात कमी- 85.97 टक्के

– यंदाही निकालात मुलींनीच मारली बाजी
– मुलींची टक्केवारी- 91.97 टक्के
– मुलांची टक्केवारी -87.27 टक्के
– मुलींचा निकाल मुलांपेक्षा 4.70 टक्के अधिक
– दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 86.87 टक्के

– 100 टक्के गुण मिळवणारे लातूर (70) आणि औरंगाबाद (23) येथे सर्वाधिक विद्यार्थी

विभागनिहाय निकाल…

कोकण – 96.00 %
कोल्हापूरः 93.88.%
पुणेः 92.08%
मुंबईः 90.41 %
नाशिकः 87.82 %
औरंगाबादः 88.81%
अमरावतीः 86.49%
लातूरः 86.30%
नागपूरः 85.97%