जिमलगठ्ठाजवळ भीषण अपघातात ७ ठार

0
17

गडचिरोली,दि.20ः-काळीपिवळी व बलेनो वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन बालकांसह सात जण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा गावापासून ५ किलोमीटरवर असलेल्या गोविंदगावच्या बस थांब्याजवळ घडली.
कमल मारोती मित्तलवार (३५), मारोती केशवराव मित्तलवार (६0), लता मारोती मित्तलवार (५५), श्रीनीता कमल मित्तलवार (५ महिने), सरस संदीप मित्तलवार (दीड वर्ष) तसेच गडचिरोली तालुक्यातील मुरखळाच्या काळीपिवळी वाहनातील निखिल देवराव मोहुर्ले (२८), चालक संदीप आनंदराव गडप (४0) अशी मृतांची नावे आहेत. तर सीमा कमल मित्तलवार, अर्चना संदीप मित्तलवार, त्रिशा सुधीर अक्केवार, प्रतिमा देवराव मोहुर्ले आणि देवराव सखाराम मोहुर्ले अशी जखमींचे नावे आहेत. त्यांना अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. देवराम मोहुर्ले यांची बदली झाल्याने त्यांचे कुटूंब आज सकाळी एमएच ३३-0७९१ क्रमांकाच्या काळी-पिवळी टॅक्सीने सिरोंचा येथून घरगुती सामान घेऊन गडचिरोली तालुक्यातील मुरखळा गावाकडे येत होते. तर चंद्रपूर येथील बंगाली कॅम्प येथून मित्तलवार कुटुंबीय एमएच ३४-बीएफ ४८६१ क्रमांकाच्या बलेनो कारने तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध कालेश्‍वरम येथे देवदर्शनासाठी जात होते. दरम्यान आलापल्लीजवळील गोविंदगावच्या बसथांब्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा जबरदस्त होता की, बलेनो वाहनाचा समोरचा भाग पूर्णत: चेंदामेंदा झाला. यात बलेनोतील ५ जण जागीच ठार झाले. जखमींना जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. परंतु तेथे काळी-पिवळी टॅक्सीचा चालक व बलेनो वाहनातील दोन बालकांनी प्राण सोडले. बलेनो वाहन चंद्रपूरच्या बंगाली कॅम्प येथील असून, त्यात एकाच कुटुंबातील सहा महिन्यांची बालिका, एक दीड वर्षीय बालक, त्यांची आई, वडील व आजी आणि आजोबा असे सर्व जण ठार झाले. यामुळे मित्तलवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.