NCP आणणार मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव!

0
10

मुंबई- महाराष्ट्र सरकारने गुजरात सरकारशी गुप्त समझोता केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खोटी माहिती दिली आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची दिशाभूल करून खोटी माहिती दिल्याने त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचेही आव्हाड यांनी म्हटले आहे.
दमणगंगा-पिंजाळ आणि तापी-नारपार या दोन नदीजोड प्रकल्पांद्वारे गुजरातला महाराष्ट्राचे पाणी दिले जाणार असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. भुजबळ यांनी राज्यातील युती सरकारवर टीका करत महाराष्ट्राचे पाणी कोणत्याही परिस्थितीत गुजरातला देणार नाही असा ठराव विधानसभेत करावा. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा, खान्देश यासारख्या पाणीटंचाईने ग्रस्त असलेल्या ठिकाणी या पाण्याचा वापर करावा. तहानलेल्या महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांनी हा ठराव विधानसभेत मांडावा, अशी मागणी भुजबळ यांनी अधिवेशवादरम्यान केली होती.मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी विधानसभेत स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी म्हटले होते की, उत्तर महाराष्ट्रातील दमणगंगा-पिंजाळ व तापी-नारपार या दोन नद्याचे पाणी गुजरातला वळविण्याबाबतचे वृत्त साफ खोटे असल्याचे म्हटले होते. नर्मदा जोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून केंद्र सरकार मान्यता देणार आहे. महाराष्ट्राच्या वाट्यातील एक थेंबही पाणी गुजरातकडे वळू देणार नाही. उत्तर महाराष्ट्रातील नार-पार योजनेअंतर्गत नर्मदा नदीतून महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे 75 टक्के पाणी मुंबईसाठी वापरण्यात येणार असून वैतरणातून मुंबईला दिले जाणारे पाणी गोदावरीला दिले जाईल. महाराष्ट्राच्या वाट्याचे एक थेंब पाणीही दुस-या राज्याला देणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते.
मात्र, आज राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याची हवा काढत प्रसारमाध्यमांना कागदपत्रे दाखविली. तसेच मुख्यमंत्री कसे खोटे बोलत आहेत ते सांगितले. विधीमंडळातील सदस्यांना खोटी माहिती दिल्याचा आरोप करीत मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.