मुंबई(विशेष प्रतिनिधी)दि.23: विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. महाराष्ट्राचे कारभारी बदलणार की महायुती सत्ता राखणार या प्रश्नाचं उत्तर येत्या काही तासांमध्ये मिळेल. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. प्रचाराची धामधूम आणि मतदान संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे मे महिन्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील केदारनाथला भेट दिली होती. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी (१९ ऑक्टोबर) संपला. त्यानंतर सोमवारी (२१ ऑक्टोबर) राज्यात मतदान पार पाडलं. उद्या मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तराखंडमधल्या केदारनाथाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. 'आज सकाळी केदारनाथाचं दर्शन आणि आशीर्वाद घेतले. हर हर महादेव!', असे मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यावेळी पत्नी अमृतादेखील त्यांच्यासोबत होत्या. लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदींदेखील केदारनाथाचं दर्शन घेतलं होते. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाआधी मोदी केदारनाथला गेले होते. १९ मे रोजी निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान होणार होतं. त्याआधी म्हणजेच १८ मे रोजी मोदी केदारनाथला गेले.





