छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून ४०० नागरिक ओलीस

0
9

रायपूर, दि. ९ – पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या आजच्या छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असणा-या दंतेवाडाच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी ४०० गावक-यांना ओलीस ठेवले आहे. पंतप्रधानांच्या सभेला जाणा-या सुकमा जिल्ह्यातील मरेंगा गावातील ४०० गावक-यांचे आज सकाळी अपहरण करण्यात आले असून त्यांना ओलीस ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांना नेमके कोठे ठेवण्यात आले आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.मरिंगा गाव दंतेवाड्यापासून ८० किमी अंतरावर आहे.
मात्र गावक-यांना ओलीस ठेवण्यात आल्याचे वृत्त पोलीस अधिका-यांनी फेटाळून लावले आहे. ओलीस ठेवण्यात आल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. नक्षलवाद्यांनी केवळ गावक-यांची भेट घेतली असे सुकमा पोलीस अधीक्षक डी शवरन यांनी सांगितले.काल रात्रीपासून नक्षलवाद्यांची गावक-यासोबत बैठक सुरु आहे. दरम्यान नक्षलवाद्यांकडून कोणतीही मागणी अद्याप करण्यात आलेली नही. मात्र मोदींच्या दौ-याला विरोध म्हणून या गावक-यांना रोखण्यात आले आहे.
४०० नागरिक आज सकाळी सभेत सहभागी होण्यासाठी गावातून निघाले, ते मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचणार तितक्यात सुमारे १०० नक्षलवादी तेथे पोहोचले. बंदुकीचा धाक दाखवत नक्षलवादी सर्व गावक-यांना जंगलाच्या दिशेने घेऊन गेले. या ओलीस नाट्यानंतर गावात प्रचंड दहशत माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच गावक-यांच्या सुटकेसाठी पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत. मरेंगा हे गाव दंतेवाडापासून ७० किलोमीटर अंतरावर असून या परिसरात तब्बल ६०० नक्षलवादी असल्याची शंका व्यक्त होत आहे.