विश्‍वास आणि जबाबदारीने काम करणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच-पटेल

0
11

गोंदिया दि.२८: काहीही न करणे, मात्र झालेल्या कामावर बोंबा मारणे हे राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही जमले नाही. मात्र ज्या पक्षाच्या पुढार्‍याने दिशाभूल करून सत्ता काबीज केली त्यांनी आता काय केले, हे सांगितले पाहीजे. मात्र त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही. भाजप हा पक्ष आणि त्याचे पुढारी बेजबाबदार आणि अविश्‍वासू आहेत, असा घणाघात करीत विश्‍वास आणि जबाबदारीने काम करणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच असून जिल्ह्यातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गोरेगाव येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत मंगळवारी ते बोलत होते. यावेळी मंचावर आ.राजेंद्र जैन, माजी आ.दिलीप बन्सोड, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्‍वरी, राकाँचे तालुका अध्यक्ष केवलराम बघेले, माजी पं.स.सदस्य डुमेश चौरागडे, जि.प.सदस्य ललिता चौरागडे, डॉ.श्रीप्रकाश रहांगडाले, राकाँचे शहर अध्यक्ष टेकेश्‍वर पटले यांच्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार उपस्थित होते.
यावेळी खा.पटेल पुढे म्हणाले, स्व.मनोहरभाई पटेल यांनी जिल्ह्याच्या विकासाची धुरा खांद्यावर घेतली होती. त्याच विकास कामांना गती देण्याचे काम आम्ही सातत्याने करीत आहोत. अदानी प्रकल्प, कवलेवाडा सिंचन प्रकल्प, कटंगी प्रकल्प, कलपाथरी प्रकल्प यासारखी महत्वपूर्ण कामे आपल्या माध्यमातून झाली आहेत. याशिवाय भेलसारख्या प्रकल्पांना मंजुरी देण्याचे काम आपण केले होते. मात्र भेल प्रकल्प भाजपने रखडून ठेवला आहे. यावरून जिल्ह्यातील बेरोजगारांची किती गय होत आहे हे स्पष्ट होते. १८ महिन्यांपूर्वी भाजपच्या पुढार्‍यांनी अनेक स्वप्न दाखविले. आजच्या पंतप्रधानांनी तर मी खाणार नाही आणि दुसर्‍यांना खाऊ देणार नाही या त्यांच्या कथनाप्रमाणे आज खर्‍या अर्थाने सर्वसामान्य माणसाच्या जेवणाच्या ताटातून डाळ हिरावून घेतली आहे. रेशन मिळत नाही. केरोसीन मिळत नाही या सांगण्यासारख्या बाबी राहिल्या नाहीत, असे पटेल म्हणाले.